नागालॅण्डचे सात आमदार फुटले, अजित पवार गटात भूकंप

अजित पवार गटामध्ये मोठा भूकंप झाला असून नागालॅण्डमधील सर्व सात आमदारांनी अचानक राजीनामा देत अजितदादांची साथ सोडली. या आमदारांनी मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोव्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टीत (एनडीपीपी) प्रवेश केला. अजित पवार गट हा नागालॅण्डमध्ये मुख्य आणि मोठा विरोधी पक्ष होता. आता हे आमदार सत्ताधारी पक्षात गेल्याने नेफ्यू सरकार पूर्ण बहुमतात आले आहे.

नागालॅण्डच्या विधानसभेत एकूण 60 आमदार आहेत. 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट 7 जागा जिंकून राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आता त्यातील नामरी नचांग, के. ए. पोंगशी पह्म, पिक्टो शोहे, वाई म्होनबेमो हम्त्सो, वाई मनखाओ कोन्याक, के. एस. तोइहो येप्थो हे आमदार एनडीपीपी पक्षात सहभागी झाले आहेत. त्यांना एनडीपीपीत सहभागी होण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे. यामुळे एनडीपीपीच्या आमदारांची संख्या 25 वरून 32 झाली आहे.

अजित पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महासचिव बृजमोहन श्रीवास्तव यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या पक्षांतराविरोधात कायद्यातील तरतुदींनुसार आणि इतर कायदेशीर प्रक्रियेतंर्गत चौकशी करण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल, असे श्रीवास्तव म्हणाले. पक्षांतर केलेल्या आमदारांशी संपर्क साधून त्यांची बाजू ऐकून घेऊ आणि त्यांनी निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

कामंच होत नव्हती म्हणून ते आमदार सत्ताधारी पक्षात गेले – अजित पवार

अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना, कामंच होत नव्हती म्हणून अस्वस्थ होऊन आपले सात आमदार सत्ताधारी पक्षात गेले असे सांगितले. ते आमदार दोन महिन्यांपूर्वी आपल्याला भेटायला आले होते, त्यांची अडचण त्यांनी सांगितली, पण अचानक त्यांनी राजीनामे दिले. दोन दिवस आपण आजारी असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पण आणखी माहिती घेईन, असे अजित पवार म्हणाले. आमदार गट बनवून सत्ताधारी पक्षात गेले असल्याने पक्षांतर कायदा लागू होत नाही, असा दावाही त्यांनी केला.