कृषिमंत्री कोकाटे भडकले, ढेकळांचे पंचनामे करायचे का?

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत फक्त उभ्या पिकांचे पंचनामे करण्यात येत असल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे. यावरून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज चांगलेच भडकले. हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार?, ढेकळांचे पंचनामे करायचे का, असा सवाल कोकाटे यांनी केला.

अवकाळीमुळे नाशिक जिह्यातील कांदा, द्राक्षे आणि इतर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात नुकसानीची पाहणी करण्यासाठी माणिकराव कोकाटे गेले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना कोकाटे यांनी, हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? शेतात जी काही पिके असतील त्यांचे पंचनामे केले जातील, असे वक्तव्य केले.

कृषिमंत्री कोकाटे हे त्यांच्या विधानावरून कायमच चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी शेतकऱयांना ‘भिकारी’ म्हणत, तसेच कर्जमाफीची रक्कम लग्नासाठी खर्च केली जाते, असे वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता. त्यावर राज्यभरातून टीका झाल्यानंतर त्यांनी माफीदेखील मागितली होती.

शेतात असलेल्या पिकांचे पंचनामे

जे कांदे वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्यांचे पंचनामे होणार नाहीत. त्याचे पंचनामे करणे अवघड आहे. ते नियमात बसत नाही. शेतात जी काही पिके असतील त्यांचे रीतसर पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांना देण्यात आल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केले.

माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेतला

अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱयांचे नुकसान झाले त्या शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळेल. ज्यांच्या शेतात पिके आहेत त्यांना माझं वक्तव्य वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. पण ज्या शेतकऱयांच्या शेतात पिके नाहीत त्याचे पंचनामे कसे करणार? त्यामुळे जे खरं आहे तेच बोललो. शब्द चुकला असेल, पण माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेतला, असे कोकाटे म्हणाले.