
मुंबईत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली फेरीवाल्यांवरील अन्यायकारक कारवाई ताबडतोब बंद करा आणि फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा, अशी मागणी फेरीवाला संघटनांनी आज केली. शिवाय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वागतही संघटनांनी केले आहे.
फेरीवाला संघटनांनी गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत फेरीवाल्यांवरील कारवाईचा निषेध केला. फेरीवाल्यांकडून हफ्तावसुली करण्यासाठी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोपही युनियनचे अध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी केला. पालिकेने अधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नाबाबत योग्य धोरण राबवल्यास बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न निर्माण होणार नाही, असेही ते म्हणाले.





























































