
मुंब्रा दुर्घटनेनंतर मध्य वसई औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी विरारनंतर नालासोपारा व वसई रोड स्थानकात उतरणे म्हणजे मोठे दिव्य असते. सकाळ, संध्याकाळच्या वेळी लोकलमध्ये चढताना आणि उतरताना जीवावर उदार व्हावे लागते.
रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वे मार्गावरही प्रवाशांना जीव धोक्यात घालून धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत. जी स्थिती मुंब्यात तिच स्थिती विरारमध्येही आहे. पश्चिम रेल्वेचा विस्तार चर्चगेटपासून डहाणूपर्यंत झालेला असला तरी विरार स्थानकातून सकाळच्या वेळी नोकरी व्यवसायासाठी मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
नुकताच विरार लोकलचा १५८ वा वाढदिवस साजरा झाला. मात्र अनेक वर्षांपासून या विरार लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाली नाही. परिणामी रोजच अप आणि डाऊन मार्गावर विरार लोकलच्या फुटबोर्डवरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. लोकल गर्दीवर पर्याय म्हणून वसई-विरारमध्ये मेट्रोचा विस्तार प्रस्तावित आहे. मुंब्रा दुर्घटनेनंतर आता त्यादृष्टीने प्रशासनाकडून जलद पावले उचलली जाणार आहेत. वसई विरार-नालासोपार येथे नागरीवस्ती वाढत चालली आहे.
३२ लाखांचा टप्पा या शहराने पार केला आहे. त्यामुळे तिथून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळेच वसईपर्यंत मेट्रो नेण्याची घोषणा करण्यात आली आहे. भौगोलिक रचना, हवामान याचा अभ्यास करून सर्वेक्षणाचे काम येत्या काही महिन्यांत पूर्ण होणार आहे. मीरा-भाईंदर शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा मार्ग जोडला जाणार आहे.