
मुंबई महापालिकेकडून मनोरी येथे समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी या आधी काढण्यात आलेल्या निविदेला कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्यामुळे ती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा नव्याने निविदा काढण्यात आली आहे.
महापालिकेने केलेल्या अभ्यास अहवालानुसार, 2041 पर्यंत मुंबईची लोकसंख्या वाढून पावणेदोन कोटींपर्यंत पोहोचणार आहे. या लोकसंख्येला दरडोई योग्य तो पाणीपुरवठा करण्यासाठी दरदिवशी 6 हजार 426 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. ही गरज भागवण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून पहिल्या टप्प्यात दररोज 200 दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होणार आहे.