शाकाहारी ऐवजी मांसाहारी बिर्याणी दिल्याने रक्तरंजित थरार, तरुणाकडून हॉटेल मालकावर गोळीबार

शाकाहारी बिर्याणीऐवजी मांसाहारी बिर्याणी दिल्याच्या रागातून तरुणाने हॉटेल मालकावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात हॉटेल मालकाचा मृत्यू झाला आहे. विजय नाग असे मयत हॉटेल मालकाचे तर अभिषेक असे आरोपी तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

झारखंडमधील रांचीतील कांके रोडवरील चौपाची रेस्टॉरन्टमध्ये शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली. काही तरुण चौपाटी रेस्टॉरन्टमध्ये शनिवारी रात्री जेवायला गेले होते. अभिषेकही त्यांच्यासोबत आला होता. अभिषेकने शाकाहारी बिर्याणी ऑर्डर केली, मात्र रेस्टॉरन्टमधील कर्मचाऱ्यांनी त्याला मांसाहारी बिर्याणी दिली. या कारणातून अभिषेकचा रेस्टॉरन्टमधील कर्मचाऱ्यांशी वाद झाला. या वादाचं हाणामारीत रुपांतर झालं.

अखेर हॉटेल मालक विजय नाग यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अभिषेकने त्यांच्यावर गोळीबार केला. जखमी अवस्थेत विजय यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर अभिषेक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.