एनसीबीला हर्बल तंबाखू आणि गांजातील फरक कळत नाही! नवाब मलिक यांचा आणखी एक भंडाफोड

एनसीबीने आपले जावई समीर खान यांच्याकडून गांजा जप्त केल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे एनसीबीने समीर खान आणि इतर दोघांवर एनडीपीएस कायद्याच्या 27(अ) कलमाअंतर्गत दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरतो, असा दावा करताना राष्ट्रवादीचे प्रवत्ते नवाब मलिक यांनी एनसीबीला गांजा आणि हर्बल तंबाखू यातील फरक कळू नये, असा सवाल केला.

अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपावरून एनसीबीने 13 जानेवारीला मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक केली होती. एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने समीर खानसह करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांना साडेआठ महिन्यांनंतर म्हणजे 27 सप्टेंबर 2021 रोजी जामीन दिला. यासंदर्भातील न्यायालयाचा लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतर मालिक यांनी एनसीबीवर निशाणा साधला. 14 जानेवारीला एनसीबीचे कर्मचारी माझ्या जावयाच्या घरी छापा मारण्यासाठी गेले. छाप्यानंतर मोठय़ा प्रमाणावर गांजा सापडल्याचे वृत्तवाहिन्यांवरून दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात घरातून काहीच जप्त करण्यात आले नव्हते. तरीही माध्यमांना खोटय़ा बातम्या देऊन बदनामी करण्याचे षडयंत्र रचले गेले, असा आरोप मलिक यांनी लावला.

200 किलो गांजा मिळालेला नाही, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. फक्त फर्निचरवालाकडे 7.5 ग्राम गांजा मिळाला. बाकी हर्बल तंबाखू आहे असे अहवालात नमूद आहे. त्यामुळे एनसीबीला तंबाखू आणि गांजातील फरक कळत नाही हे आश्चर्यकारक आहे. या संस्थेकडे तपासणी साहित्य असते. ज्यातून अमली पदार्थ आहे किंवा नाही हे लगेच समजते. याचा अर्थ त्यांनी या सर्व गोष्टी तपासल्या, गांजा नव्हता. पण तरी लोकांना अडकवण्यात आले, असा आरोप मलिक यांनी केला.

दरम्यान, मलिक यांच्या आरोपानंतर एनसीबीचे क्षेत्रीय अधिकारी समीर वानखेडे यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. हे प्रकरण सध्या वरच्या  न्यायालयात आहे. अशा प्रकरणात आपण काही बोलू शकत नाही, असे वानखेडे म्हणाले.

मोबाईल नंबरही दिला

जप्त केलेल्या गांजाचे व कारवाईचे फोटो एनसीबीच्या एका अधिकाऱयाच्या मोबाईलवरून पत्रकारांना पाठविण्यात आले होते. तो मोबाईल नंबरही (9820111409) मलिक यांनी माध्यमांना दिला. जप्तिची प्रक्रिया चुकीची असल्याचे कोर्टात सिद्ध झाले. कुठलिही गोष्ट जप्त केल्यानंतर ती तिथल्या तिथे सील केली जाते, मात्र माध्यमांना पाठविण्यात आलेले फोटो हे एनसीबीच्या कार्यालयातील होते. असा मुद्दा आम्ही कोर्टात उचलला. त्यावर एनसीबीकडे उत्तर नव्हते. मिडीयाने हे फोटो काढले असावेत असे सांगण्यात आले. त्यातून या प्रकरणात गडबड असल्याचे समोर आले. असे मलिक म्हणाले.