जेजुरीतील नाझरे धरण 100 टक्के भरले

जेजुरी शहर, औद्योगिक वसाहत, मोरगाव व 36 गावांना पाणीपुरवठा करणारे नाझरे धरण मंगळवारी 100 टक्के भरले. धरणातील स्वयंचलित दरवाजे उघडले असून, पाण्याचा विसर्ग 570 क्युसेक वेगाने सुरू झाला आहे.

मंगळवारी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम जेजुरीत होता. याच वेळी दुपारी चार वाजता नाझरे धरण भरल्याची वार्ता जेजुरीकरांना मिळाली. यामुळे जेजुरीकरांच्या आनंदात अधिक भर पडली. मागच्या वर्षी जून महिन्यात नाझरे धरण कोरडे पडले होते. दरवर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत धरणात पुरेसा पाणीसाठा होतो; परंतु यंदा पुरंदर तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने कऱ्हा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नाझरे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. या धरणाची पाणी साठवणक्षमता 788 दशलक्ष घनफूट असून, त्यातील 200 दशलक्ष घनफूट मृत साठा मानला जातो. जेजुरीला श्री खंडोबाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. या भाविकांना आता पुरेसे पाणी उपलब्ध होईल. तर, औद्योगिक वसाहतीमध्येही नाझरे धरण भरल्याने समाधानाचे वातावरण आहे.

नदीकाठाजवळील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
यंदा अपेक्षापेक्षा लवकर नाझरे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या सांडव्यावरून पाणी कऱ्हा नदीत वेगाने येत आहे. या नदीपात्राच्या कडेला असलेल्या गावातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोठा पाऊस आल्यास पाण्याचा वेग वाढू शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, असे आवाहन नाझरे धरणाचे शाखा अभियंता अनिल घोडके व विश्वास पवार यांनी केले आहे.