
राज्यात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले असून एकीकडे होळी साजरी होत असतांना शेतकऱ्यांच्या पिकांची होळी झाली. तर धुळवडीचे रंग खेळले जात असतांना शेतकऱ्यांचे जीवनच बेरंग झालं. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत घोषित करण्याची गरज आहे. गुजरात सारख्या राज्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्यावर 350 कोटी रुपयांची मदत घोषित केली. महाराष्ट्रात तर सर्वाधिक कांदा उप्तादक शेतकरी असतांना अद्याप महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत का नाही असा सवाल राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला.
छगन भुजबळ म्हणाले की, अवकाळी पावसामुळे प्रचंड असे नुकसान झाले असून काही ठिकाणी द्राक्षाच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने या बागा उभ्या कराव्या लागणार आहे. त्यामुळे हे द्राक्ष शेतकरी आता पाच वर्ष मागे गेला आहे. कांदा, गहू, हरबरा, आंबा, भाजीपाला यासह अनेक शेती पिकाचे मोठ नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरश: आपलं तोंड बडवून घेत आहे. आज महिला दिन साजरा होत असताना माय माऊली देखील आपण तोंड बडवून घेत रडताय ही अतिशय गंभीर बाब आहे, असं भुजबळ म्हणाले.
कांदा उत्पादक शेतकरी अडचणी आला असून अद्यापही शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही. याबाबत आपण सभागृहात भूमिका मांडली. अद्यापही नाफेड प्रत्यक्ष मार्केटमध्ये कांदा खरेदी न करता बाहेरच कांदा खरेदी करत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, नाशिक जिल्ह्यात तर शेतकऱ्यांनी कांद्याला भाव न मिळत असल्याने चक्क गाव विकायला काढले आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. गुजरात सारखे छोट राज्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 कोटी रुपयांची मदत करतंय. आपल्या राज्यातील शेतकरी अवकाळी व शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत आला आहे. ही परिस्थिती आता हाताबाहेर चालली असून शासनाने तातडीने कारवाई करत मदतीची घोषणा करावी. सभागृहात यावर चर्चा करून आजच्या आज निर्णय घ्यावा, अशी मागणी भुजबळ यांनी बोलतांना केली.
या दरम्यान शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. तात्काळ मदत करण्यात येऊन आजच सभागृहात सविस्तर निवेदन करण्यात येईल, अशी माहिती उत्तरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.