
आषाढी यात्रा सोहळ्यासाठी सुमारे 14 ते 15 लाख भाविक पंढरपूरात येतात. यामुळे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराकडे येणारा व जाणारा मार्ग एकच असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी येथे असते. अशावेळी चेंगराचेंगरी होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता असते. हीच शक्यता लक्षात घेत 5 जुलै रोजी सकाळी 6 ते 6 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी, भाविक यांच्याकरीता बाहेर पडण्यासाठी एकेरी रहदारीस खुला ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत.
एकादशी सोहळयादिवशी चंद्रभागा स्नान करून भाविक श्री विष्ठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. तेव्हा महाद्वार घाट व आजूबाजूच्या रस्त्यांवर लाखो भाविकांची गर्दी असते. सदरची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला मानवी साखळीचा व रस्सीचा वापर करावा लागतो.
दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असून भाविकांना पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधा कमी पडू नये यासाठी प्रशासन कार्यरत आहे. पश्चिमद्वार ते चौफाळा हा एकेरी मार्ग झाल्यास स्टेशन रोडकडून येणारे वारकरी, भाविक हे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक भादुले चौक ते नाथ चौक तांबडा मारूती चौक- महाद्वार चौकमार्गे नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जाऊ शकतात. तसेच प्रदक्षिणामार्गे येणारे भाविक हे उत्पात गल्ली येथील रस्त्याने नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जावू शकतात.
पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी, भाविकांना बाहेर पडण्याचा एकेरी रहदारी मार्ग केल्यास गर्दीवर नियंत्रण करणे सुरक्षित होईल. त्यामुळे पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी भाविकांसाठी बाहेर पडण्याचा एकेरी रहदारीसाठी होणे सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वाचे आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 34 (क) अन्वये, सदर आदेश पारीत केला आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास उल्लंघन करणाऱ्या विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 नुसार कारवाईस पात्र राहील, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.