
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱया परशुराम घाटातील रखडलेल्या कामांना आता वेग आला असून, येथील गॅबियन वॉलचे काम येत्या 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदार कंपनीला देण्यात आल्या आहेत. 5.40 किलोमीटर अंतराच्या या घाटात चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत होत्या, ज्यामुळे येथील संरक्षक भिंतींना धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या ‘टीएचडीसीएल’ संस्थेच्या शिफारशीनुसार कोटय़वधी रुपये खर्चून डोंगराला जाळी बसवणे आणि गॅबियन वॉल उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या अकाली पावसामुळे घाटातील कामांचे नियोजन कोलमडले होते. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्ग विभागाने त्यावेळी काम थांबवून एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती. पावसाळा सुरू होण्यापूर्वी घाटातील सर्व तांत्रिक कामे उरकून वाहतूक पूर्णपणे पूर्वपदावर आणण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि कंत्राटदार कंपनीने ठेवले आहे.
























































