राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात EVM विरोधात आंदोलन; जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी

नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडत आहे. अशातच मुंबईत राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी करण्यात आली. यानंतर आंदोलन करणाऱ्या चारजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

विधानसभा, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकतही भाजपला मोठे यश मिळाले. यामुळे पुन्हा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करण्यात येत असून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. कार्यकर्ते थेट राज्य मुंबईतील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घुसले. आणि ईव्हीएम हटाव देश बचाओ, अशा घोषणा दिल्याने एकच गोंधळ उडाला. प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा राजश्री उंबरे पाटील यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी हे आंदोलन केले.

ईव्हीएमवर बंदी घाला, सत्ताधारी ईव्हीएमचा वापर करून निवडणूक जिंकत आहे. तसेच निवडणूक आयोग आमच्या तक्रारींची दखल घेत नाही, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. घोषणाबाजीनंतर पोलिसांनी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. हे कार्यकर्ते धाराशिवचे असल्याचे सांगण्यात येत आहे.