
यंदाचा ऊस गळीत हंगाम अद्याप सुरू व्हायचा आहे परंतु त्यापूर्वीच सातारा जिह्यातील 3 आणि सोलापूर जिह्यातील 2 साखर कारखान्यांनी विना परवाना ऊस गाळप सुरु करून साखर आयुक्तांच्या निर्णयाला ठेंगा दाखवला आहे. साखर आयुक्तालयाने देखील संबंधित पाच साखर कारखान्यांना शो कॉज नोटिसा बजावल्या असून याप्रकरणी उद्या (दि.27) सुनावणी ठेवण्यात आली आहे.
विनापरवाना ऊस गाळप हंगाम सुरू करणाऱ्यांमध्ये सातारा जिह्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना (रेठरे,ता.कराड), जयवंत शुगर्स प्रा.लि. (धावरवाडी.ता.कराड), ग्रीन पॉवर शुगर्स प्रा.लि. (गोपुज,ता.खटाव) या 3 साखर कारखान्यांचा समावेश आहे. तर सोलापूर जिह्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. (वेणुनगर,गुरसाळी,ता.पंढरपूर) आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.-युनिट नं. 2 (करकंब,ता.पंढरपूर) या 2 साखर कारखान्यांचा समावेश आहे. प्रादेशिक सहसंचालकांच्या अहवालानंतर या कारखान्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितले.




























































