
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तिकडून फोन आला आणि ‘जी हुजूर’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना शरण गेले, असे सांगत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला.
भोपाळ दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी कॉँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेदरम्यान भारताने अचानक केलेल्या शस्त्रसंधीच्या घोषणेवरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. राहुल गांधी म्हणाले, तिकडून ट्रम्पने एक फोन केला आणि म्हटले, मोदीजी काय करताय? त्यावर ‘जी हुजूर’ करत नरेंदर सरेंडर झाले आणि ट्रम्प यांच्या इशाऱ्याचे पालन केले.
- देशाची संपूर्ण संपत्ती काही निवडक लोकांच्या हाती सोपवली जात आहे. सर्वत्र फक्त दोन-तीन लोकच दिसतात, जणू काही त्यांच्याशिवाय देशात दुसरे कोणतेही उद्योगपती नाहीत. देशातील 90 टक्के लोकांकडे दुर्लक्ष करून सर्व पैसा काही निवडक लोकांच्या हाती सोपवला जात आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
कॉँग्रेस महासत्तांशी लढते
इंदिरा गांधी यांनी 1971 च्या युद्धावेळी अमेरिकेच्या धमक्यांना न जुमानता पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. कॉँग्रेसचे लोक हे सरेंडर होणारे नाहीत, तर महासत्तांशी लढणारे आहेत. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल हे महासत्तांशी लढणारे होते, असे राहुल गांधी म्हणाले.
भाजप, आरएसएस पळपुटे
भाजप, आरएसएसच्या लोकांना मी चांगलाच ओळखतो. त्यांच्यावर थोडासा जरी दबाव टाका, थोडासा धक्का मारा, ते घाबरून पळून जातात. सरेंडर होणे हा यांचा इतिहास आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाच्या वेळीदेखील त्यांनी असाच पळ काढला, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.