मत चोरी ही लोकशाहीवरचा हल्ला, राहुल गांधी यांनी सुरू केले अभियान

निवडणूक आयोगाने मतचोरी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्याचे पुरावेही राहुल गांधी यांनी सादर केले होते. आता फक्त तेवढ्यावरच न थांबता राहुल गांधी यांनी मतचोरीविरोधात अभियान सुरू केले आहे. जनतेने या अभियानाला साथ द्यावी म्हणून राहुल गांधी यानी एक नंबर आणि वेबसाईट जारी केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करून म्हटले की, मत चोरी करणे हा ‘एक व्यक्ती, एक मत’ या मूलभूत लोकशाही तत्त्वावर हल्ला आहे. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी स्वच्छ मतदार यादी आवश्यक आहे.

निवडणूक आयोगाकडे आमची मागणी स्पष्ट आहे पारदर्शकता दाखवा आणि डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करा, जेणेकरून जनता आणि राजकीय पक्ष स्वतः तिचे ऑडिट करू शकतील असे राहुल गांधी म्हणाले. तसेच जनतेला आवाहन करत तुम्हीही आमच्यासोबत येऊन या मागणीचे समर्थन करा – http://votechori.in/ecdemand वर जा किंवा 9650003420 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. ही लढाई लोकशाहीचे रक्षण करण्याची आहे असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी अलीकडील पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. यावर आयोगाने कडक आक्षेप घेतला आणि सांगितले की राहुल गांधींनी आदित्य श्रीवास्तव यांच्या प्रकरणाचा उल्लेख केला, तर या प्रकरणात 2018 मध्येच कारवाई पूर्ण झाल्याचे सांगितले.