
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेच सरेंडर झाले, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पाकिस्तानसोबत शस्त्रसंधीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. राहुल गांधी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या दौऱ्यावर आहेत. तिथे मंगळवारी त्यांनी पक्षाच्या आमदार आणि जिल्हाध्यक्षांसोबत संघटनेच्या निर्मितीबाबत बैठक घेतली. यानंतर काँग्रेस कार्यकर्ता परिषदेला संबोधित करताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला.
राहुल गांधी म्हणाले की, “भाजप-आरएसएसच्या या स्वभावाचा इतिहास साक्षीदार आहे. ते नेहमीच झुकतात. अमेरिकेच्या धमक्यांना न जुमानता हिंदुस्थानने 1971 मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. काँग्रेसचे सिंह आणि सिंहिनी महासत्तांशी लढतात, ते कधीही झुकत नाहीत.”
राहुल गांधी पुढे म्हणाले की, “देशाची संपूर्ण संपत्ती काही निवडक लोकांच्या हाती सोपवली जात आहे. सर्वत्र फक्त दोन-तीन लोकच दिसतात, जणू काही त्यांच्याशिवाय देशात दुसरे कोणतेही उद्योगपती नाहीत. देशातील 90 टक्के लोकांकडे दुर्लक्ष करून सर्व पैसा काही निवडक लोकांच्या हाती सोपवला जात आहे.”