
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस उत्पादनात क्रांती घडविण्याच्या उद्देशाने राजारामबापू कारखान्याने राज्यात सर्वप्रथम पुढाकार घेत आपल्या कार्यक्षेत्रात 15 हवामान केंद्रांची उभारणी केली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिली.
बोरगाव येथे प्रगतशील शेतकरी बाबासाहेब सलगर यांच्या शेतात एआय तंत्रज्ञानाअंतर्गत उभारण्यात आलेल्या हवामान केंद्राच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संचालक कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, प्रदीपकुमार पाटील, शैलेश पाटील, राजकुमार कांबळे, कृष्णेचे अविनाश खरात, तसेच सचिव डी. एम. पाटील उपस्थित होते.
प्रतीक पाटील म्हणाले, ‘माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी सखोल चर्चा करण्यात येत आहे. याअंतर्गत 402 शेतकरी एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊसशेती करणार आहेत. शेतकऱ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ही हवामान केंद्रे उभारण्यात आली आहेत. प्रत्येक हवामान केंद्राचा लाभ त्या-त्या परिसरातील सुमारे पाच किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. या प्रकल्पात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, बारामती कृषी विज्ञान केंद्र, व्हीएसआय मांजरी (बु.) तसेच संबंधित शेतकरी परस्परांच्या सहकार्याने सहभागी होणार आहेत.’
सध्या ठिबक सिंचन व रोप लागवड केलेल्या ऊसशेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, भविष्यात पाट पाण्याच्या शेतीतही हे तंत्रज्ञान वापरण्याचा मानस असल्याचे पाटील यांनी सांगितले.
यावेळी सहायक कृषी संशोधन अधिकारी विवेक पुजारी यांनी शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अशोक सलगर यांनी प्रास्ताविक केले, तर माजी उपसरपंच राजेंद्र वाटेगावकर यांनी आभार मानले.




























































