रत्नागिरीकरांना करोडोचा चुना लावणाऱ्या आर्जू टेकसोलची मालमत्ता जप्त होणार, प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी

कच्चा माल आम्ही देतो पक्का माल बनवून द्या. त्या मालाची विक्री आम्ही करू अशी जाहिरात करत रत्नागिरीकरांना आर्जू टेकसोलची कंपनीने सहा कोटीहून अधिक रूपयांना गंडा घातला होता. यात साडेपाचशेहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. आज आर्जू टेकसोलची कंपनीच्या मालमत्तेची प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी पाहणी केली. आर्जू टेकसोलची ही मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.

रत्नागिरी एमआयडीसीमध्ये आर्जू टेकसोल कंपनी सुरू करण्यात आली होती. कच्चा मालापासून पक्का माल बनविण्याच्या जाहिराती करून त्यांनी लोकांना आकर्षित केले. त्यानंतर गुंतवणूकीच्या योजना सुरू केल्या. साडेपाचशेहून अधिक गुंतवणूकदारांनी आमिषाला बळी पडून गुंतवणूक केली. साडे सहा कोटी रूपयांपेक्षा अधिक गुंतवणूक जमा झाली होती. परतफेडीची वेळ आली तेव्हा संचालकांनी पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल केल्या होत्या.

रत्नागिरी एमआयडीसी येथे आर्जू टेकसोल कंपनीचे कार्यालय आणि गोदाम आहे. त्या मालमत्तेची आज प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी पाहणी केली. ही मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचे जीवन देसाई यांनी सांगितले.