
‘बेस्ट’मध्ये नोकरी करीत असताना अनेक कारणांमुळे जीव गमवावा लागलेल्या कर्मचाऱयांची शेकडो मुलांना अनुकंपा तत्त्वाखाली नोकरी मिळण्यासाठी ‘वेटिंगवर’ असताना ‘बेस्ट’ प्रशासनाने निवृत्त कर्मचाऱयांना लाखो रुपयांचे वेतन देऊन कामावर घेण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे अनुकंपा तत्त्वावरील गरजवंतांवर प्रचंड अन्याय होत आहे. याची दखल घेत बेस्ट कामगार सेनेने बेस्ट प्रशासनाला ‘उफराटा’ कारभार थांबवा अन्यथा धडक आंदोलनाचा इशारा दिला आहे.
‘बेस्ट’ कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी याबाबत ‘बेस्ट’ प्रशासनाला निवेदन दिले असून निवृत्त अधिकारी, कर्मचाऱयांची ‘चांदी’ थांबवा अशी मागणी केली आहे. बेस्टमध्ये सध्या निवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचारी वर्गास परत कामावर घेण्याची अयोग्य प्रथा पडली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी बेस्टमधून निवृत्त झालेले वाहतूक अधिकारी रवी शेट्टी, बिराजदार यांना जवळपास एक लाखाच्या वर गलेलठ्ठ पगार देऊन बेस्ट उपक्रमात बेस्टच्या महाव्यवस्थापक यांच्या मान्यतेने परत कामावर ठेवण्यात आले होते. त्यांना परत बेस्टमध्ये कामावर घेऊन बेस्टला कोणताही फायदा झाला नसल्याचा आरोपही सामंत यांनी केला आहे. तर आजपासून बेस्टमधील लेखा विभागातील निवृत्त पर्यवेक्षक अमोल मोराजकर यांना बेस्ट उपक्रमाने महाव्यवस्थापक यांच्या मान्यतेने परत बेस्टच्या लेखा विभागात कामावर घेतले. बेस्टमध्ये सदर विभागात अधिकारी-कर्मचारी वर्ग असताना अशा निवृत्त अधिकारी कर्मचारी वर्गास परत कामावर घेऊन चुकीची प्रथा पडत आहे.
n निवृत्त अधिकारी-कर्मचारी वर्गाची शिफारस बेस्टच्या महाव्यवस्थापकांना करून ‘आपले काम’ करण्याचा डाव साधत असल्याचा आरोपही बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला.
n बेस्टमधील हुशार-कार्यक्षम अधिकारी, कर्मचाऱयांना संधी मिळत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. शिवाय बेस्टमधून निवृत्त झालेल्या 2500 कर्मचाऱयांची उच्चशिक्षित मुले नोकरीच्या प्रतीक्षेत असताना असा प्रकार सुरू आहे. याबाबत बेस्ट कामगार सेना 15 जुलै रोजी बेस्टच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन जाब विचारणार आहे.