रोखठोक – इतक्या वर्षांनंतरही मुंबई कुणाची? महाराष्ट्र दिनाची जुनी खंत

महाराष्ट्र स्थापनेस 62 वर्षे झाली तरी ‘मुंबई कुणाची?’ हा प्रश्न कायम चर्चेत असतो. कारण देशाचे हे प्रमुख आर्थिक, औद्योगिक केंद्र महाराष्ट्रापासून वेगळे करावे यासाठी अमराठी धनिकांची अखंड धडपड आजही सुरूच आहे! जे अखंड हिंदुस्थानचे फक्त स्वप्नच दाखवतात तेच लोक महाराष्ट्राचे शत्रू बनले आहेत.

महाराष्ट्राची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने चालली आहे? महाराष्ट्र अस्तित्वात येऊन 62 वर्षे झाली व राज्याच्या निर्मितीचे उत्सव नित्यनेमाने साजरे होत आहेत. पण महाराष्ट्र आज कधी नव्हे इतका अशांत आणि अस्थिर झाला आहे. आदर्शाची हेटाळणी हा सध्याच्या महाराष्ट्रातील एक नवा चाळा होऊ पाहतो आहे. हे आता रोजच घडत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पेंद्र सरकार साजरा करीत आहे. त्या स्वातंत्र्याच्या लढय़ात महाराष्ट्र अग्रस्थानी होता याचा विसर सध्याच्या पेंद्रीय नेतृत्वास पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, अटक-पंधारपर्यंत तलवार चालविणारे पेशवे, औरंगजेबाला महाराष्ट्रातच गाडणारे मऱहाटे, तात्या टोपे, झाशीची राणी, क्रांतिवीर फडके, लोकमान्य टिळक नसते तर स्वातंत्र्यलढय़ाची ठिणगी भडकली असती काय? महाराष्ट्राने आदर्श निर्माण केले, त्या आदर्शाची हेटाळणी करणारे लोक याच राज्यात निर्माण झाले. समाजाच्या अनेकांगी विकासाची लहान-मोठी स्वप्ने डोळय़ांपुढे ठेवून त्या स्वप्नांना सत्यात आणण्यासाठी आपले आयुष्य त्या कार्यात झोकून देणारी माणसे महाराष्ट्रात चोहोबाजूंनी दिसत होती. आदर्श, ध्येय या शब्दांवर महाराष्ट्रीय समाजाचा विश्वास होता. कारण त्या शब्दांमागे असंख्य ध्येयवीर लोकांची फौज महाराष्ट्राने निर्माण केली. दि. 24 एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान मोदी लता मंगेशकर यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईला आले. पंतप्रधान मुंबईत, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नावच त्या निमंत्रण पत्रिकेवर नाही. हा महाराष्ट्राचाच अपमान. लता मंगेशकर महाराष्ट्राच्या, त्यांना जाऊन चार महिने झाले नाहीत. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या नावाने पुरस्कार दिला तो मोदींना पंतप्रधान म्हणून. त्यांचेही कर्तव्य होते ‘‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निमंत्रितांत नाहीत काय?’’ असे आयोजकांना विचारण्याचे. पण तसे घडले नाही. कारण महाराष्ट्राशिवाय देशाचे राजकारण सुरू झाले आहे आणि मराठी नेते काँग्रेस काळात नव्हते त्यापेक्षा जास्त दिल्लीचे गुलाम झाले आहेत. आजच्या महाराष्ट्र दिनी या स्थितीची खंत कोणाला वाटेल काय?

राज्य घडविणारे नेते!

श्री. शरद पवार हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवरील मोठे नेते. महाराष्ट्र घडविण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र घडविण्याबाबतचे योगदान वेगळय़ा पद्धतीचे आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते एक व्यंगचित्रकार म्हणून फटकारे मारीत होते. पुढे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या हक्कांसाठी ते प्रत्यक्ष रणात उतरले. नंतर त्यांनी केलेली शिवसेनेची स्थापना व त्यातून उभा राहिलेला स्वाभिमानी महाराष्ट्र हे आदर्श कार्य आहे. मुंबईत शिवसेना नसती तर आज ती केंद्रशासित व्हायला वेळ लागला नसता. बाळासाहेब ठाकरे यांनी तोलामोलाचे राजकारण केले, पण ते मुख्यमंत्री वगैरे झाले नाहीत. त्यांनी अनेकांस त्या ‘पदावर’ बसवले व विकासात्मक कामे करून घेतली. शरद पवार हे अनेकदा मुख्यमंत्री व पेंद्रात मंत्री झाले. महाराष्ट्रातल्या औद्योगिक, सामाजिक जडणघडणीत त्यांनी काम केले. यशवंतरावांनी या कार्याची सुरुवात केली. शरद पवारांनी ते शिखरावर नेले. औद्योगिक महाराष्ट्राने देशासमोर आदर्श ठेवला. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचे मूळ मुंबईच्या आर्थिक शक्तीत आहे. या शक्तीवरच आता पेंद्राने घाव घालायला सुरुवात केली व महाराष्ट्राच्या मोठेपणाचा मुकुट खाली उतरवला. मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून जागतिक स्तरावरचे नेते मुंबईत येत नाहीत. त्यांना आधी गुजरातला व मग दिल्लीत नेले जाते. श्री. शरद पवार यांनी हीच खंत आठवडाभरापूर्वी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी हे हिंदुस्थानात येणाऱया जागतिक नेत्यांना गुजरातमध्ये नेऊन स्वतःच्या राज्याचा विकास करतात, असे श्री. पवारांसारखे नेते सांगतात तेव्हा ती बाब गांभीर्याने घेतलीच पाहिजे. गुजरातशी भांडण असण्याचे कारण नाही, पण मुंबई-महाराष्ट्राला कमीपणा दाखविण्यासाठी हे केले जाते. देशात इतरही राज्ये व शहरे आहेत. पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात, त्यात मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. हे ‘आर्थिक’ महत्त्व कमी करण्यासाठी मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय पेंद्र गुजरातमध्ये नेले गेले. उद्या मुंबईचे हात-पायही अशा प्रकारे छाटले जातील!

मुंबई कोणाची?

इतक्या वर्षांनंतरही मुंबई कोणाची, असा प्रश्न विचारला जात आहे. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत राहणाऱया सर्वांची आहे. कारण ती हिंदुस्थानची आहे. पण आधी ती महाराष्ट्राची आहे म्हणून हिंदुस्थानची आहे. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची कारस्थाने आजही पूर्णपणे संपलेली नाहीत. आधी मुंबईचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी करायचे व एका बेसावध क्षणी मुंबई पेंद्रशासित करायची. श्री. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या महाराष्ट्रातील भाजपास या सगळय़ाची पूर्ण कल्पना आहे. फडणवीस यांनी मुंबईत जे अमराठी पंचक निर्माण केले आहे, त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कशी करता येईल याचे एक ‘प्रेझेंटेशन’ तयार करून गृह मंत्रालयास सादर केले. ‘विक्रांत’ घोटाळय़ातील आरोपी व त्यांच्या अमराठी बिल्डर साथीदारांकडे त्या मोहिमेची सूत्रे आहेत. एका बाजूला आपण महाराष्ट्र दिन साजरा करायचा व त्याच वेळी महाराष्ट्राच्या भूगर्भात मुंबई तोडण्याबाबत हालचालींना वेग यावा, हे बरे नाही.

अशांत महाराष्ट्र

पुरोगामी आणि औद्योगिकदृष्टय़ा आघाडीवर असलेला महाराष्ट्र आज अशांत बनला आहे. जात-पोटजातीत महाराष्ट्र फाटला आहे काय? आणि धर्मांधतेच्या राजकीय खेळांत तो खचतो आहे काय? अशी स्थिती आज उघडपणे दिसत आहे. अज्ञानात राहिलेला व मागासलेला म्हणून हिणवला गेलेला बहुजन समाज शाहू महाराजांनी चालता-बोलता केला. कालप्रवाहात संस्थान भूतकाळात गेले, परंतु शाहू महाराजांचे नाव मात्र घरोघरी राहून गेले ते कायमचे. आता या शाहू महाराजांचे नाव उठसूट का घेता, असा प्रश्न महाराष्ट्रातील नवनिर्माणवाल्यांना पडावा व पुन्हा त्यांच्या डोक्यावर हिंदुत्वाचा फेटा चढावा याचे आश्चर्य वाटते. यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरे व शरद पवारांपर्यंत अनेक नेत्यांनी बहुजन समाजाला प्रतिष्ठा देणारेच राजकारण केले. त्या बहुजन समाजानेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईत प्रत्येक वेळी झोकून दिले. तो बहुजन समाजही आता तत्त्वहीन झाल्यासारखा भरकटला असे चित्र दिसते. महाराष्ट्राला कमजोर करणारा हा प्रकार आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत व मुंबईच्या लढाईत त्याग करण्यासाठी मुंबईतील कष्टकरी म्हणजे बहुजन समाजच उतरला. मुंबईतील कष्टकरी आज कमजोर झाला व धनिक, श्रीमंतांच्या हातात मुंबईची सूत्रे गेली. अंबानींना मागे टाकून श्रीमंतीचा मुकुट आज गौतम अदानी यांच्या डोक्यावर विराजमान झाला आहे. जगातले पाचवे श्रीमंत म्हणून त्यांचा लौकिक आज आहे. त्या मुकुटातील अनेक पिसे मुंबई-महाराष्ट्राची आहेत. पण महाराष्ट्राच्या हाती या सगळय़ांतून काय लागले? स्वातंत्र्यलढय़ात नेहरूंना ‘बंदी’ म्हणून नगरच्या किल्ल्यात ठेवले होते. नेहरूंना स्वतंत्र खोली होती. या टीचभर खोलीत बसून नेहरूंनी सबंध हिंदुस्थानचा शोध घेतला. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या ग्रंथाचा जन्म याच खोलीत झाला. 15 वर्षांच्या इंदिरेला 12 सप्टेंबर 1932 रोजी तुरुंगातून नेहरूंनी पत्र लिहिले. ते सांगतात, ‘‘शिवाजी राजा हा खरा मराठय़ांचे वैभव वाढविणारा व मोगल साम्राज्याचा कर्दनकाळ होऊन गेला.’’ लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी औरंगजेबाने केलेल्या छळवणुकीचा विषय काढला. 1932 साली नेहरूंनी शिवाजी राजांचा उल्लेख मोगल साम्राज्याचा कर्दनकाळ असा केला याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिवाजी राजे म्हणजेच महाराष्ट्र! त्यामुळेच महाराष्ट्राला इतिहास प्राप्त झाला. त्या इतिहासावर घाव घालण्याचे काम सुरू झाले आहे. आजच्या महाराष्ट्र दिनी मराठी माणसाने कोणता संकल्प केला पाहिजे याचे उत्तर एका वाक्यात द्यायचे तर, मुंबईसह महाराष्ट्र अखंड राखण्याचा!

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]