
आम्ही कोणत्याही पंथाच्या विरोधात नाही. जबरदस्तीने धर्मांतरित झालेल्यांना जर स्वधर्मात परत यायचे असेल तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र, स्वतःच्या इच्छेने केलेल्या धर्मांतराला कोणताही विरोध नको, अशी भूमिका रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री अशोक नेताम यांनी, आदिवासी समाजासमोर धर्मांतर ही एक मोठी समस्या आहे. धर्मांतर रोखायचे असेल तर कायदा हवाच. यासाठी संघाने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी, आपल्या मतानुसार जर कुणी आपली पूजा पद्धती बदलत असेल तर संघाने कधीही त्यावर आक्षेप घेतला नाही. मात्र, जबरदस्ती, आमिष दाखवून किंवा फसवून धर्मांतर होऊ नये अशी संघाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.
पंथ, संप्रदायाला संघाचा विरोध नाही. ईसा मसिह, पैगंबर सगळय़ांवर श्रद्धा आहे. त्यात आम्हीही सहभागी आहोत. आपापल्या पद्धतीने सगळे उपासना करतात.
द्विराष्ट्रवादाचा धोका
शांततेत राहता यावे म्हणून पाकिस्तान वेगळा झाला; परंतु त्यानंतरही अशांती पसरवण्याचा त्यांचा दुटप्पीपणा गेला नाही. अजूनही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून द्विराष्ट्रवादाचा धोका कायम आहे. युद्धाचे प्रकार बदलत असल्यामुळेच आपल्याला सुरक्षेसाठी आत्मनिर्भर व्हावे लागेल, असे मोहन भागवत म्हणाले.
सर्व पक्ष एकत्र येणे हीच लोकशाही
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारतीय सेनेची वीरता पुन्हा एकदा जगाने पाहिली. पहलगाम हल्ल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकता दाखवली. असेच दृश्य कायम राहिले तर ही देशासाठी फार गौरवाची बाब आहे. देशभक्तीच्या वातावरणात राजकीय स्पर्धा विसरले हेच उत्तम लोकशाहीचे दृश्य आहे, असे मोहन भागवत म्हणाले.