सामना अग्रलेख – दंगलीचे राजकारण! रामनाम बदनाम कोण करत आहेत?

अयोध्येत भव्य राममंदिर उभे राहत आहे. सर्व काही शांततेत सुरू असताना पुन्हा रामाच्या नावाने हिंसा घडवणे हे षड्यंत्र आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांआधी रामाच्या नावाने दंगलींचा आगडोंब पेटवून त्या आगीवर पुन्हा एकदा नकली हिंदुत्वाची भाकरी शेकण्याची ही दळभद्री योजना आहे. देश लुटणाऱ्या अदानी भ्रष्टाचारावरचे लक्ष उडून जावे व दंगलीचा उन्माद माजवून लोकांनी धर्माची भांग पिऊन गप्प पडावे व त्याच भांगेच्या नशेत मतदान करावे असे हे कारस्थान आहे. रामनवमीच्या निमित्ताने जे घडले ते ‘रामनाम सत्य’ नसून रामनामाची बदनामी आहे. राम हे मर्यादापुरुषोत्तम होते, पण त्यांच्या नावाने दंगा करणाऱ्यांनी मर्यादाच ओलांडल्या. राम जीवनाचा हिस्सा आहे. जीवनाचा हिस्सा असा हिंसक होऊन कसे चालेल? पण देशात तेच चालले आहे.

श्रीरामनवमीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दंगलीच्या ठिणग्या पडल्या. हे काही बरे घडले नाही. मर्यादापुरुषोत्तम, संयमी, एकवचनी, सत्यवचनी म्हणून श्रीरामाची कीर्ती आहे. त्या रामाच्या जन्मदिनी त्याचे भक्त म्हणवून घेणारे हिंसा करतात. इतरांच्या प्रार्थनास्थळांवर दगडफेक करतात, हे चित्र जगातल्या चौथ्या की पाचव्या आर्थिक महासत्तेस शोभा देणारे नाही. उलट देशाची ‘शोभा’ करणारेच हे प्रकार आहेत. राम हे हिंदुस्थानचे महानायक मानले जातात. त्या महानायकाचा जन्मदिवस दंगलीसाठी ओळखला जावा हे त्या महानायकाचे दुर्दैव म्हणावे लागेल. रामनवमीच्या पूर्वसंध्येस व त्याच दिवशी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मुंबईतील मालवणी येथे दंगली झाल्या. गुजरातमधील वडोदरा येथे दोन धार्मिक गटांत दगडफेक झाली. प. बंगालातील हावडा येथेही रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान दंगल घडविण्यात आली. हे सर्व हिंदू-मुसलमानांत झाले व भाजपास हवे तेच झाले. छत्रपती संभाजीनगरात शहराच्या नामांतराची सूचना निघाल्यापासूनच पेटवापेटवीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, दंगलीमागच्या डोक्यांनी मुहूर्त साधला तो श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येचाच. दोन गटांतील वादानंतर मुस्लिमांच्या जमावाने राममंदिरासमोरच धुमाकूळ घातला. पोलिसांची वाहने जाळली. राममंदिराजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, पण हे असे अचानक का घडले? की सर्व काही पूर्वनियोजित व ठरल्याप्रमाणे घडले? अनेक शोभायात्रांत बेफाम पोरांनी नंग्या तलवारी नाचवल्या व धार्मिक उन्मादाची झलक दाखवली. रामनवमी आणि तलवारीचा संबंध काय? तलवार ही रामायण काळात नव्हती.

तलवार ही

भवानी मातेची, शिवरायांची. मग रामनवमीच्या शोभायात्रेत नंग्या तलवारी नाचवण्याचे प्रयोजन काय? प्रभू श्रीरामाच्या हाती धनुष्य शोभते, पण राजकीय स्वार्थासाठी धनुष्यबाणाचा सौदा झाल्यापासून निदान महाराष्ट्रात तरी धनुष्यबाणाचे तेज फिके पडले आहे. आता रामनवमीच्या शोभायात्रेत सहभागी झालेल्यांनी हाती दगड घेतले व तलवारी घेऊन नाचवल्या. छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात जमाव अनियंत्रित झाला व पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या दंगलीत एकाचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. शहरातीलच हर्सुल भागातील ओहर येथेदेखील रामनवमीनिमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत तरुणांच्या दोन गटांत हाणामारी झाली. छत्रपती संभाजीनगरात रामनवमीच्या निमित्ताने अचानक अशी दंगल का उसळावी? हे कोण महाभाग आहेत, ज्यांना महाराष्ट्राला चूड लावायची आहे? छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, भिवंडी ही दंगलींची शहरे म्हणून एकेकाळी ओळखली जात होती, पण गेल्या काही वर्षांत हे चित्र साफ बदलले आहे. अर्थात दंगली नसल्या की, अनेकांच्या रोजीरोटीची सोय होत नाही. त्यामुळे अशा दंगलबाज टोळय़ांना हवा देऊन राजकारणी मंडळी शहरे व गावे जाळत असतात. महाराष्ट्रात तेच घडताना दिसत आहे. डॉ. मिंधे हे मुख्यमंत्री झाले, पण राज्य अनेक बाबतीत अधोगतीस जात आहे. लोकांचा त्यांना भोपळय़ाइतकाही पाठिंबा नाही. त्यामुळे दंगलींचा आधार घेऊन ते स्वतःला हिंदुत्वाचे पुरस्कर्ते मानून घेत आहेत. हा महाराष्ट्र धर्माचा खेळखंडोबाच म्हणायला हवा. हे असे करून कोणी राजकीय भाकऱया शेकत असेल तर ते राज्य बुडवायला निघाले आहेत. कश्मीरातील तरुणांनी लष्करावर दगड मारले, दंगली पेटवल्या. त्यांच्या हातात दगड आला. कारण त्यांच्या

हातांना काम

नाही. हाताला काम नसलेल्यांना दंगली घडविण्याचे काम देणारी राजकीय फॅक्टरी गेल्या सात-आठ वर्षांपासून देशात सुरू झाली आहे व प्रभू श्रीरामांच्या नावाने दंगली घडवून वातावरण पेटवा अशी योजना आहे. हे विधान आम्ही अत्यंत जबाबदारीने करीत आहोत. आठ दिवसांपूर्वीच मुंबईसह महाराष्ट्रात हिंदू नववर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा, रथयात्रा निघाल्या. त्या शोभायात्रा मुसलमानांच्या मोहल्ल्यांतूनही गेल्या. त्या शोभायात्रांवर कोणी दगड मारले नाहीत व त्या शोभायात्रेत सहभागी झालेल्यांनी मशिदीवर पेट्रोल बॉम्ब फेकले नाहीत. मग हे सर्व पुढच्या आठ दिवसांनी आलेल्या रामनवमीच्या शोभायात्रेतच का घडले? हा संशोधनाचा विषय आहे. गुजरात व महाराष्ट्रात भाजपचे राज्य आहे. तरीही अशा दंगली होत आहेत. अयोध्येत भव्य राममंदिर उभे राहत आहे. सर्व काही शांततेत सुरू असताना पुन्हा रामाच्या नावाने हिंसा घडवणे हे षड्यंत्र आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांआधी रामाच्या नावाने दंगलींचा आगडोंब पेटवून त्या आगीवर पुन्हा एकदा नकली हिंदुत्वाची भाकरी शेकण्याची ही दळभद्री योजना आहे. देश लुटणाऱया अदानी भ्रष्टाचारावरचे लक्ष उडून जावे व दंगलीचा उन्माद माजवून लोकांनी धर्माची भांग पिऊन गप्प पडावे व त्याच भांगेच्या नशेत मतदान करावे असे हे कारस्थान आहे. रामनवमीच्या निमित्ताने जे घडले ते ‘रामनाम सत्य’ नसून रामनामाची बदनामी आहे. राम हे मर्यादापुरुषोत्तम होते, पण त्यांच्या नावाने दंगा करणाऱयांनी मर्यादाच ओलांडल्या. राम जीवनाचा हिस्सा आहे. जीवनाचा हिस्सा असा हिंसक होऊन कसे चालेल? पण देशात तेच चालले आहे.