तंजावरचे स्थलमाहात्म्य – सुजानबाई तंजावरची स्त्री-राज्यकर्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. समीर जाधव

व्यंकोजीराजे/ एकोजीराजे (दुसरे) यांच्या मृत्यूनंतर तंजावरचा राज्यकारभार त्यांची पत्नी सुजानबाई यांनी हाती घेतला व तंजावरवर राज्य करणाऱया त्या पहिली महिला ठरल्या. तंजावरच्या इतिहासात फारशी दखल न घेतलेल्या या राज्ञीचा कार्यकाळ जाणून घेऊया.

अलीकडेच आपण जागतिक महिला दिन साजरा केला. यानिमित्ताने पौराणिक, ऐतिहासिक आणि वर्तमानातील सामाजिक, राजकीय तसेच इतर क्षेत्रांतील अनेक स्त्रियांचे स्मरण, वंदन केले. इतिहासाने अनेक स्त्रियांच्या कार्याला उजेडात आणले, तर काही स्त्रियांकडे दुर्लक्ष केले. या दुर्लक्षित स्त्रियांमध्ये एक स्त्री तंजावरच्या भोसलेकालीन राजघराण्यातील आहे आणि ती म्हणजे तंजावरची पहिली स्त्राr-राज्यकर्ती सुजानबाई. तंजावरमधील मराठय़ांचा इतिहासावर मराठी, इंग्रजी आणि तामीळमध्येही अनेक पुस्तके लिहिली गेलीत. परंतु यातील एकाही पुस्तकात सुजानबाईंविषयी विस्तृत माहिती येत नाही. अगदी तंजावरमधील भोसले घराण्याचे आताचे वंशज श्री प्रतापसिंह भोसले यांनी लिहिलेल्या ण्दहूग्ंल्tग्दह द ऊप्aहरन्ल्r श्aratप्a क्ग्हे या पुस्तकातही सुजानबाईंविषयी फारशी माहिती येत नाही. सुजानबाईंविषयी जी माहिती उपलब्ध आहे ती केवळ त्यांच्या काळात निर्माण झालेल्या अराजकतेची. इ. स. 1736 सालीच चंदासाहेबाने तंजावरवर स्वारी केली. त्या वेळी व्यंकोजीराजे/ एकोजीराजे (दुसरे) यांनी लष्कराची सारी सूत्रे हाती घेतली आणि चंदासाहेबाची स्वारी परतून लावली. या लढाईचा तंजावरच्या खजिन्यावर परिणाम झाला. अशा अस्थिर राजकीय परिस्थितीत राज्याची घडी नीट बसावी म्हणून त्यांनी एक मंत्रिमंडळ नेमले. परंतु या मंत्रिमंडळालाही काही मार्ग काढता आला नाही.

याच वेळी इ. स. 1737 साली व्यंकोजीराजे/ एकोजीराजे (दुसरे) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सुजानबाई या तंजावरच्या गादीवर बसल्या. तंजावरवर राज्य करणाऱ्या त्या पहिली महिला ठरल्या. सुजानबाईंनी तंजावरवर तीन वर्षे राज्य केले. इ. स. 1737 ते इ. स. 1739 या तीन वर्षांच्या काळात तंजावरमध्ये अराजकता निर्माण झाली, अशी माहिती विनायक वाकसकर यांच्या ‘तंजावरचे मराठे राजे’ या पुस्तकामध्ये येते. सुजानबाईंच्या काळात राजकारभार नेमका कशा पद्धतीने चालू होता, सुजानबाईंचे व्यक्तिमत्त्व कसे होते याबद्दल काहीच माहिती उपलब्ध होत नाही. तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयातही याबाबतची कागदपत्रे उपलब्ध नाहीत. केवळ या काळात अराजकता कशी निर्माण झाली हीच माहिती उपलब्ध होते.

सुजानबाईंच्या राजवटीतच कट्टूराज नावाचा एक तोतया राजपुत्र निर्माण झाला. आपण सरफोजीराजे (पहिले) यांचे पुत्र आहोत असे त्याने जाहीर केले आणि तंजावरच्या राजगादीवर हक्क सांगितला. सुजानबाईंच्या कारभाराला कंटाळून सिदोजी, तुलाजी, तुकाजी व सुब्बा चेट्टी या मंत्र्यांनी या तोतयाला साथ दिली. या सर्वांना तंजावरचा किल्लेदार सय्यदची साथ लाभली. सय्यद हा व्यंकोजीराजे (पहिले) यांच्या काळापासून कार्यरत होता. दुसऱया व्यंकोजीराजेंच्या कारकीर्दीत तो अधिक प्रभावशाली ठरला होता. तोतया कट्टूराज याने सय्यदच्या मदतीने सुजानबाईंना कैद केले आणि तंजावरच्या गादीवर विराजमान झाला. एका स्त्राrच्या कार्यशैलीला विरोध म्हणून राजकारणातील पुरुष एका तोतयाला साथ देतात आणि सुजानबाईंना पदच्युत करतात, जी खरी वारसदार असते. हे पुरुषसत्ताक व्यवस्थेचेच द्योतक आहे हे उघड उघड दिसते.
तोतया राजाने फ्रेंचांना आणि इंग्रजांना अनेक वचने व देणगी देऊन मदत मिळवली होती, परंतु हा तोतया राजा फार काळ टिकला नाही. तो कुप्पी/रूपी या धोबिणीचा पुत्र होता, हे लवकरच सिद्ध झाले. त्यामुळे कट्टूराजला पदच्युत करण्यात आले आणि प्रतापसिंहराजेंना तंजावरच्या गादीवर बसवण्यात आले. प्रतापसिंहराजे हे तुकोजीराजेंना अन्नपूर्णा या मराठा खांडाराणीपासून (जुन्या काळी राजपूत राजे किंवा मराठा सरदार ज्या स्त्रियांशी त्यांच्या तलवारीशी (खांडा) विवाह लावून उपपत्नी म्हणून दर्जा देत, त्यांना ‘खांडाराणी’ किंवा उपराज्ञी म्हटले जाई.) झालेला मुलगा होता. प्रतापसिंहराजांनी स्वतःच्या मनाविरुद्ध तंजावरचे राजेपद स्वीकारले होते. त्यांनी इ. स. 1740 ते 1760 पर्यंत तंजावरवर राज्य केले.
(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)
[email protected]