सांगली जिल्हा बँकेची कारवाई; 2.11 कोटींचा अपहार, सात कर्मचारी बडतर्फ

शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेल्या निधीवर डल्ला मारून कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी जिल्हा बँकेतील सात कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. सात कर्मचाऱ्यांनी मिळून विविध शाखांमध्ये 2 कोटी 11 लाख 60 हजार रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. अपहारप्रकरणी अजून 18 कर्मचाऱ्यांची खातेअंतर्गत चौकशी सुरू आहे.

सांगली जिल्हा बँकेने बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांत इंद्रजित विठ्ठल वाघमारे (शाखा बसर्गी), योगेश सुरेश वजरीनकर, प्रमोद सुरेश कुंभार (शाखा मार्केटयार्ड तासगाव), बाळासाहेब नारायण सावंत (पलूस), प्रतीक गुलाब पवार, मच्छिंद्रगड म्हारगुडे व दिगंबर पोपट शिंदे (शाखा नेलकरंजी) या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणांसाठी शासनाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना भरपाई, अनुदान स्वरूपात मदत दिली जाते. जिल्हा बॅँकेत गेल्या आठ ते दहा वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांच्या मदतीचे कोटय़वधी रुपये बँकेत पडून आहेत. या रकमेत बॅँकच्या काही शाखांमध्ये कर्मचाऱ्यांनीच अपहार केल्याच्या घटना गेल्या वर्षभरात सातत्याने उघडकीस आल्या आहेत. हा अपहारही चार ते पाच वर्षांपूर्वी झाला आहे. मात्र, बॅँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी बॅँकेच्या सर्वच शाखांची अंतर्गत तपासणी मोहीम सुरू केल्याने हे घोटाळे उघडकीस आले आहेत.

सांगली जिल्हा बॅँकेच्या विविध शाखांमध्ये शासकीय मदत, अनुदान व देणे व्याज यामध्ये पाच कोटी 22 लाख रुपयांचा अपहार आतापर्यंत उघडकीस आला आहे. बॅँकेने संबंधित कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत 2 कोटी 90 लाख रुपये वसूल केले आहेत. तसेच शासकीय अपहाराची सर्व रक्कम बॅँकेने शासनास परत केली आहे. शिवाय अपहार करणाऱ्या 25 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यातील काहींवर फौजदारी दाखल केली आहे. या सर्वच घोटाळेबाज कर्मचाऱ्यांची खातेअंतर्गत चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अंतिम अहवाल आल्यानंतर त्यांच्या बडतर्फीची कारवाई होणार आहे. सात कर्मचाऱ्यांचा सदरचा अहवाल बॅँकेस प्राप्त झाला असून, त्यात या कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे सात कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

सरकार, नाबार्डकडून कारवाईचे कौतुक
सांगली जिल्हा बॅँकेत शासन अनुदान व बँकेच्या देणे व्याजात कोटय़वधी रुपयांचा अपहार उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी अधिवेशनातही चौकशीची मागणी झाली. त्यानुसार सहकार विभागाने चौकशीचे आदेश दिले. मात्र, जिल्हा बॅँकेने त्यापूर्वीच घोटाळेबाज कर्मचाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे पाऊल उचलले. सर्वच घोटाळेबाजांना निलंबित केले. काहींवर फौजदारी दाखल केली तसेच बडतर्फीची कारवाईही केली. या कारवाईबाबत सहकार विभाग, नाबार्ड व चौकशी अधिकाऱ्यांनीही कौतुक केले.