जगभरातील विमान वाहतूक क्षेत्राला कोडं पडलंय की एकाचवेळी दोन इंजिन बंद पडली कशी? – संजय राऊत

एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाचा अपघात झाला कसा किंवा हे घडले कसे, 30 सेकंदामध्ये काय घडले आणि एकाचवेळी दोन इंजिन बंद पडली कशी हे जगभरातील विमान वाहतूक क्षेत्राला पडलेले कोडे आहे. सायबर हल्ल्याच्या माध्यमातून शत्रू राष्ट्राने यंत्रणा हायजॅक केली का अशी शंकाही लोक उपस्थित करत आहेत. आपण त्यातील एक्स्पर्ट नाही आहोत, पण असे सायबर हल्ले होणे ही गंभीर गोष्ट आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.

शनिवारी सकाळी माध्यमांनी संजय राऊत यांना ड्रीमलायनरच्या खरेदी व्यवहाराबाबत आणि अपघाताताबाबत विचारले असता ते म्हणाले की, ड्रीमलायनरच्या अपघाताची चौकशी सुरू आहे. हा अपघात किंवा लोकांच्या मनात ज्या अन्य शंका आहेत त्या संदर्भात देशातील आणि विदेशातील एजन्सी एकत्र तपास करत आहेत. ब्रिटन, पोर्तुगालचे पथक इथे आले आहे. बोइंगची टीम आलेली आहे. आपल्याही काही एजन्सी आहेत. त्याच्यामुळे त्यावर मत व्यक्त करणे योग्य नाही.

ड्रीमलायनरचा व्यवहार झाला होता तेव्हा भाजपने त्याच्या क्षमतेविषयी, इंजिनाविषयी शंका उपस्थित केल्या होत्या. कारण यूपीए सरकारच्या काळात ही खरेदी झाली. नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांना तेव्हा वारंवार खुलासा करावा लागत होता, अशी आठवणही राऊत यांनी सांगितली.

ते पुढे म्हणाले की, अपघाताबाबत माझ्या मनातही काही शंका आहेत. त्या शंका उघडपणे बोलून गोंधळ निर्माण करणे बरे नाही. आमच्याकडे विविध क्षेत्रातून माहिती येत असते.

Air India Plane Crash – सात एजन्सीज करणार अपघाताची चौकशी, 270 मृतदेह हाती; सातजणांची ओळख पटली

हा विषय मुळात मेंटेनन्सचा आहे. अहमदाबाद विमानतळ जिथून हे विमान उडायला परवानगी दिली. तिथे ज्या मेंटेनन्स, इंजिनियरिंग संस्था आहेत, एटीसी आहे, डीजीसीए आहे तिथे 56 टक्के माणसे कमी आहेत. ज्यांच्याकडून विमानांच्या सुरक्षेची सगळ्यात जास्त जबाबदारीची अपेक्षा करतो तेथेच माणसे कमी आहेत. का आणि कशासाठी? अहमदाबाद एअरपोर्ट कुणाच्या ताब्यात आहे? मेंटेनन्सची जबाबदारी कुणावर आहे? असा सवाल करत या सगळ्या गोष्टींबाबत लोक, प्रवासी यांच्या मनात संशय आहे. हा संशय असाच राहिला तर विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या घटेल, अशी भीतीही राऊत यांनी व्यक्त केली.

Air India Plane Crash – “अत्यंत असंवेदनशील…”; दुर्घटना कोणी रोखू शकत नाही असे म्हणणाऱ्या अमित शहांवर काँग्रेसची सडकून टीका