प्रफुल्ल लोढा हा छोटा मासा, मोठा मासा मंत्रीमंडळात आहे; संजय राऊत यांची टीका

महाराष्ट्राच्या राजकारणात हनी ट्रॅपमुळे खळबळ उडालेली आहे. या ट्रॅपमध्ये राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांचा समावेश असल्याचे बोलले जात असून हे मंत्री कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी भाजप कार्यकर्ता प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात मुंबई पोलीसांनी पोस्कोअंतर्गत गुन्हे दाखला करून अंधेरीतून त्याला अटक केली. याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘प्रफुल्ल लोढा हा छोटा मासा, मोठा मासा मंत्रीमंडळात आहे”, अशी टीका केली आहे.

”एकनाथ शिंदे यांची ताकद 8 आमदारांचीच आहे. उरलेले सगळे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी पाठवले आहे. हनी ट्रॅपची सीडी, पेन ड्राईव्ह दाखवून असतील. वेष बदलून अंधारात त्याचं प्रेझेंटेशन दिलं असेल. त्यामुळे सरकार पाडण्यात आलं. आमचे तर चार खासदार फक्त हनी ट्रॅप मुळेच गेले आहेत. मी जागा सांगू शकतो त्यांच्यासाठी कुठे ट्रॅप लावले होते. आम्ही त्यांना सावधही केलं होतं. भाजप खालच्या तळावर जाऊन राजकारण करत आहे. देवेंद्रजी बोलतात हनी ट्रॅपसारखं काहीही नाही. पण पोलीस रोज धाडी टाकत आहेत. गुप्तपणे धाडी पडत आहे. पोलीस गुप्तपणे काहीतरी शोधत आहेत. मला वाटतं पोलीस पेनड्राईव्ह का सीडी शोधत आहेत. प्रफुल्ल लोढा हा छोटा मासा, मोठा मासा मंत्रीमंडळात आहे. त्यामुळे पोलिसांनी निष्पक्षपणे तपास करायला हवा. महाराष्ट्राचे पोलीस याचा तपास करू शकणार नाहीच. पोलीस पेन ड्राईव्ह आणि सीडी कुठे लपवली ते शोधण्यासाठी काम करत आहेत, त्यात काय आहे ते अनेकांना माहित आहे. हे प्रकरण इतकं भयंकर आहे की या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडून व्हायला हवा, असे संजय राऊत म्हणाले.

दिल्लीतील हमिदाबाई हे सगळं करतेय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणाचा कोठा झालाय. या कोठ्यावर जे नाचतायत आता त्यांना नाचवणारी हमिदाबाई दिल्लीतच आहे, असेही ते म्हणाले.

गिरीश महाजन यांच्या पत्रकार परिषदेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”प्रफुल्ल लोढा पेढा कोणाला भरवतोय, मिठी कुणाला मारतोय. तो कोणत्या पक्षात होता. तो जे सांगतोय ते काय सांगतोय ते पाहा, गिरीश महाजन यांच्यावर अशाप्रकारचे आरोप सतत होतायत. त्यांच्यावर मी आरोप करत नाहीत. पण गिरीश महाजन यांनी हे समजायला हवे की दुसऱ्यावर आरोप केल्यावर त्यांच्यावरचे डाग धुतले जात नाही. फडणवीसांचे संकटमोचक समजून घेणाऱ्यांचे कॅरेक्टर काय आहे, किती शुद्ध चारित्र्याचे लोकं आहेत हे दिसतंय. कुंभला जाऊन तुम्ही डुबक्या मारल्या असतील म्हणून काय महाराष्ट्र शुद्ध झाला नाही. महाराष्ट्र अधिक गढूळ झाला आहे”, असे संजय राऊत म्हणाले.