
शेअर बाजार आज जोरदार आपटला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १२०० अंकांनी कोसळला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही कोसळला. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्वच सेक्टरमधील कंपन्यांना या घसरणीचा फटका बसला आहे.
शेअर बाजार कधी उसळेल आणि कधी आपटेल हे सांगणं सध्या कठीण झालं आहे. मुंबईचा निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीची चाल वेगाने बदलत आहे. गुरुवारी सेन्सेक्स १२०० अंकांनी कोसळला. तर निफ्टीतही मोठी घसरण होऊन ५० अंकांपर्यंत खाली गेला. बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाल्याने मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांना मोठा फटका बसला. यामुळे गुंतवणूकदारांचे जवळपास ८ लाख कोटी रुपये बुडाले.
बाजार का कोसळला?
अलिकडच्या काळात झालेल्या तेजीनंतर देशांतर्गत बाजारात नफावसुली दिसून येत आहे. बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी ५० वधारला होता. अर्थसंकल्प, हिंदुस्थान-अमेरिका करार आणि आरबीआय पत धोरण आणि तिसऱ्या तिमाहीच्या निकालांचा टप्पा संपल्यानंतर, देशातील नवीन कारणांच्या अभावामुळे शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचा परिणाम, अमेरिका-इराणमधील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ ही आंतरराष्ट्रीय कारणंही कारणीभूत आहेत.
























































