तुम्हीच लग्न करून मुलं जन्माला का घालत नाही, अविमुक्तेश्वरानंद यांचा मोहन भागवत यांना सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किमान तीन मुले जन्माला घालण्याचे आवाहन हिंदूंना करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर शंकराचार्य अविमुत्तेश्वरानंद यांनी आज जोरदार टीका केली. ‘‘मोहन भागवत आणि त्यांचे प्रचारक स्वतः लग्न करून मुलं जन्माला का घालत नाहीत? सर्वात आधी भागवत यांनी ही कृती करून लोकांपुढे उदाहरण ठेवले पाहिजे,’’ असा खोचक सल्ला अविमुत्तेश्वरानंद यांनी दिला.

बरेली येथील देवभूमी आयटीआयला अविमुत्तेश्वरानंद यांनी आज भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. हिंदू लोकसंख्येच्या मुद्दय़ावरून त्यांनी भागवत यांना जोरदार टोले हाणले. ‘‘लोकसंख्येचा स्पह्ट होत आहे असे एकीकडे सरकार म्हणत आहे. दुसरीकडे आरएसएसचे लोक लोकसंख्या वाढवण्याच्या गोष्टी करतात. हिंदूंची लोकसंख्या वाढणे इतकेच महत्त्वाचे असेल तर ते काम तुम्ही आधी केले पाहिजे. दुसऱ्यांवर ओझे का टाकता? आधी स्वतः करा, मग दुसऱ्यांना सांगा,’’ असे अविमुत्तेश्वरानंद यांनी सुनावले.

मोदींच्या मौनामुळे देश चिंतेत

इराण-अमेरिका युद्धावरून अविमुत्तेश्वरानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. ‘‘युद्ध होते तेव्हा दोन पक्ष असतात. एक न्यायाचा आणि अन्यायाचा. अशा वेळी विद्वानांनी न्याय्य बाजू कोणाची आणि अन्यायी बाजू कोणाची हे ठणकावून सांगितले पाहिजे. मात्र इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धात तसे दिसले नाही, असे ते म्हणाले. हिंदुस्थानने आजवर कुठल्याही युद्धात कोणा एकाची बाजू घेतली नाही. मात्र या वेळी पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांच्या मौनामुळे लोकांच्या मनात संभ्रम आहे. मोदी उघडपणे इस्रायलची बाजू घेत आहेत. हिंदुस्थान ज्यूंच्या जाळ्यात अडकत आहे. ही देशासाठी चिंतेची बाब आहे,’’ असे अविमुत्तेश्वरानंद म्हणाले.

युद्धामुळे गॅस सिलिंडर मिळत नाहीएत. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना याचे अजिबात सोयरसुतक दिसत नाही. त्यांच्या बंगल्याची वीज जात नाही की त्यांचे रेशन कमी होत नाही. त्यांच्यासाठी सगळे उत्तम चाललेय. पण जनता त्रस्त झालीय.’’