
अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. संपूर्ण देश शोकमग्न असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या अपघातात 290 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उद्धव ठाकरे यांनी मृत व्यक्ती व त्यांच्या कुटुंबाविषयी संवेदना आणि शोक व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘एअर इंडियाचा हा अपघात व त्यातील मृतांचा आकडा हेसुद्धा एक राष्ट्रीय संकट आहे. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. आई जगदंबा मृतात्म्यांना शांती देवो व मृतांच्या कुटुंबांना या धक्क्यातून सावरण्याचे बळ देवो, एवढेच मी या क्षणी बोलू शकतो. अपघाताचे दृश्य आणि मनुष्यहानी पाहून शब्द फुटत नाहीत, अशी माझ्यासह सगळय़ांची स्थिती आहे.’’