
पूर्वी घराघरात टीव्हीला केबल कनेक्शन पाहायला मिळायचे. मात्र बदलत्या तंत्रज्ञानामुळे मनोरंजनाची अनेक नवनवीन माध्यम आल्याने केबल व्यवसाय आता आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या सात वर्षात चार कोटी केबल कनेक्शन कमी झाले असून याचा फटका या क्षेत्रात काम करणाऱ्यांना बसला आहे. 2018 ते 2025 दरम्यान सुमारे 5 लाख 77 हजार नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत, असे एका अहवालात म्हटले आहे.
ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशन आणि ईवाय इंडिया यांनी संयुक्तपणे ‘स्टेट ऑफ केबल टीव्ही डिस्ट्रीब्यूशन इन इंडिया’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. यासाठी 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 28,181 स्थानिक केबल ऑपरेटरकडून माहिती मागवण्यात आली होती. अहवालानुसार, पे-टीव्ही सबस्क्रायबर बेस 2018 साली 151 मिलियन होता त्यात घसरण होऊन 2024 मध्ये 111 मिलियनवर आला आहे. 2030 पर्यंत हा आकडा आणखी कमी होऊन 71 ते 80 मिलियनदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
उत्पन्नात सातत्याने घट
अहवालानुसार, चार डीटीएच प्लेयर्स आणि दहा प्रमुख केबल टीव्ही प्रोव्हायडर्सच्या उत्पन्नात 2018 पासून 16 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली असून त्यांचे मार्जीन 29 टक्क्यांनी घटले. आर्थिक वर्ष 2019 मध्ये, त्यांचा महसूल 25,700 कोटी होता, जो आर्थिक वर्ष 2024 मध्ये 21,500 कोटी रुपयांवर आला. एकत्रित एबिटा आर्थिक वर्ष 2019 मध्ये 4,400 कोटी रुपयांवर होता जो आर्थिक वर्ष 2024 मध्ये 3,100 कोटी रुपयांवर घसरला. कोरोना काळात मनोरंजनासाठी ओटीटी माध्यमांची लोकप्रियता वाढल्याने हा फटका बसल्याचेही समोर आले आहे.
केबल व्यावसायिक आशावादी
सर्वेक्षणात केबल ऑपरेटर्सनी रोजगारात 31 टक्के घट नोंदवली असून जी 37,835 नोकऱ्यांचे नुकसान दर्शवते. राष्ट्रीय पातळीवर याचा विचार केल्यास 1,14,000 ते 1,95,000 पर्यंतच्या नोकऱ्या कमी झाल्या आहेत. याव्यतिरिक्त 2018 पासून जवळजवळ 900 मल्टी सिस्टम ऑपरेटर (एमएसओ) आणि 72 हजार लोकल केबल ऑपरेटर (एलसीओ) बंद झाल्याने एकूण 5,77,000 लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, असे अहवालात म्हटले आहे. असे असले तरी हे चित्र नक्कीच बदलेल याबाबत केबल व्यावसायिक आशावादी आहेत.