गेट वे ऑफ इंडिया जेट्टी प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत भाष्य नाही; सुप्रीम कोर्टाचे स्पष्टीकरण

गेट वे ऑफ इंडियाजवळ जेट्टी प्रकल्पाचे बांधकाम करण्यास परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. त्याचवेळी सरन्यायाधीशांनी ‘आमची मुंबई’ आणि ‘त्यांची मुंबई’ यातील अंतराबाबत मत नोंदवले होते. कुलाब्यात ‘त्यांची मुंबई’ राहते, तर मालाड, ठाणे, घाटकोपरमध्ये ‘आमची मुंबई’ राहते, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली. त्याची बरीच चर्चा झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने जेट्टी प्रकल्पाच्या गुणवत्तेवर कोणतेही भाष्य केलेले नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए. जी. मसीहा यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी झाली. यावेळी कुलाब्यातील क्लीन अँड हेरिटेज कुलाबा रेसिडेंट्स असोसिएशनच्या वतीने वरिष्ठ वकील संजय घोष यांनी ‘आमची आणि त्यांची मुंबईतील’ सरन्यायाधीशांच्या टिप्पणीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सरन्यायाधीशांनी आपण जेट्टी प्रकल्पाच्या गुणवत्तेवर कोणतेही भाष्य केलेले नाही, असे स्पष्ट केले. वरिष्ठ वकील संजय हेगडे यांच्यामुळे वृत्तपत्रांमध्ये ती विधाने प्रसिद्ध झाली. वास्तविक, ते ‘आमची-त्यांची’ नव्हे, तर ‘आमची-तुमची’ आहे, अशी मिश्किल टिप्पणी सरन्यायाधीशांनी यावेळी केली.