शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाची सुनावणी 8 ऑक्टोबरला, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला लांबणीवर

supreme court

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 8 ऑक्टोबरला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर सुनावणीची ही नवीन तारीख जाहीर केली.

शिवसेनेशी गद्दारी केलेल्या मिंधे गटाला पक्ष आणि निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुंबई, ठाण्यासह सर्व महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांत होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मिंधे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्यापासून रोखा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी जुलै महिन्यात अंतरिम अर्जाद्वारे केली. त्या अर्जाची दखल घेताना न्यायमूर्ती सुर्य कांत यांच्या खंडपीठाने मूळ याचिकाही लवकर निकाली काढणार असल्याचे संकेत दिले. त्यावेळी 20 ऑगस्टला सुनावणी निश्चित केली होती. मात्र राज्यांच्या विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती व राज्यपालांना वेळमर्यादा आखून दिली पाहिजे का, याबाबत राष्ट्रपतींनी मागवलेल्या सल्ल्यावर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठ स्थापन केले आहे. त्या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती सूर्य कांत यांचा समावेश आहे. ते घटनापीठ 19 ऑगस्टपासून 10 सप्टेंबरपर्यंत घेणार आहे. त्यामुळे शिवसेनेची सुनावणी 20 ऑगस्टऐवजी 8 ऑक्टोबरला होणार आहे. त्या सुनावणीमध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला होणार असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हा विलंब अन्यायकारक!

न्यायिक विलंबासाठीचे कारण तारखेच्या निमित्ताने होणे ही आपल्या न्याय व्यवस्थापनातील चूक आहे. संवैधानिक गुंतागुंत असलेल्या प्रकरणांमध्ये त्वरीत निर्णय होणे अपेक्षित असताना तारखांमुळे होणारा विलंब अन्यायकारक आहे. ज्यांनी प्रथमदर्शनी संवैधानिक अनैतिकता प्रस्थापित केली आहे, अशा राजकीय व्यक्तींना लांबच्या दिलेल्या तारखांमुळे सातत्याने राजकीय जीवनदान मिळत आले आहे, असे मत अॅड. सरोदे यांनी व्यक्त केले.