‘नागरी उड्डाण’च्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळे यांची मागणी

साधा माणूसही स्वस्तात विमान प्रवासात जात असल्याच्या जाहिराती केल्या जातात. मात्र, सरकारचे सुरक्षिततेला प्राधान्य नाही. नागरी उड्डाण क्षेत्रात अनेक वर्षांपासून दुर्लक्षित प्रश्न आहेत. यासंदर्भात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पारदर्शकता ठेवून गेल्या दहा वर्षांतील कामकाजाची एक श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

महापालिकेत शहरातील पावसाळापूर्व कामे, पालखी तयारी, समाविष्ट गावांचे प्रश्न आदी कामकाजाचा खासदार सुळे यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अहमदाबाद येथील विमान अपघातावर सुळे म्हणाल्या, आज ब्लॅक बॉक्स मिळाला आहे. आता त्याच्या रिपोर्टची वाट बघावी लागेल. येणाऱ्या अधिवेशनात पहलगाम आणि यावर सविस्तर चर्चा करण्याची मागणी करू. सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. पुण्यात विमानतळाचे नवे टर्मिनल झाले आणि पहिल्या पावसात ते तुंबले, याची चौकशी व्हावी. इन्फ्रास्ट्रक्चर होत आहेत; पण सुरक्षेचे काय? पब्लिक ट्रान्स्पोर्ट हा विषय योग्य पध्दतीने हाताळायला हवा. पब्लिक ट्रान्स्पोर्ट सुरक्षित असले पाहिजे. सगळ्याबाबतीत बेसिक सेफ्टी पाहिजे. मुंबईतील रेल्वे वापरकर्त्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षेत सुधारणा करणे हे केंद्र सरकारचे प्राधान्य असायला हवे. तसेच, नागरी विमान वाहतूक हे एक मोठे रेड फ्लॅग ठरले आहे. बऱ्याच काळापासून ही बाब दुर्लक्षित राहिली आहे. आता सरकारने याबाबत एक श्वेतपत्रिका जाहीर करून जनतेला वास्तव काय आहे ते सांगावे, अशी मागणीही त्यांनी केली.

प्रभाग रचनेवर सुळे म्हणाल्या, प्रभाग रचना पारदर्शकपणे आणि एक स्टँडर्ड असावे. त्याचा फॉर्म्युला सर्व राज्याला लागू असावा.

दरम्यान, गंगाधाम चौकातील रस्त्याची कामे लवकर पूर्ण करावीत. खडकवासला धरणातील प्रदूषणावर लक्ष घालावे. आदी मागण्या सुळे यांनी केल्या.