Vaishnodevi Landslide: मृतांची संख्या 30 वर पोहोचली, जम्मू कश्मिरमध्ये पावसाचा कहर

जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथील वैष्णोदेवी मंदिराजवळ मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनाच्या दुसऱ्या दिवशी मृतांची संख्या वाढली. एसएसपी रियासी परमवीर सिंह यांनी याची पुष्टी केली आहे.

मंगळवारी (२६ ऑगस्ट) दुपारी ३.०० वाजता कटरा येथील अर्धकुंवारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ मोठा भूस्खलन झाला. काही वेळातच ८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले, तर २० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. कालांतराने मृतांची संख्या ३० वर पोहोचली.

भूस्खलनानंतर, मदत आणि बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ढिगाऱ्याखाली लोकांना शोधून रुग्णालयात नेण्यात येत आहे. भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि एनडीआरएफचे जवान लोकांना वाचवण्यात अथक परिश्रम घेत आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी लोक गाडले जाण्याची शक्यता आहे.

मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत तीन पुलांचे नुकसान झाले आहे. भूस्खलनामुळे माता वैष्णोदेवीची यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. जम्मूमधील पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीमध्ये, कठुआमधील रावी पुलाचा एक भाग वाहून गेला आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरने २२ सीआरपीएफ जवान, ३ स्थानिक नागरिक आणि एका सीआरपीएफ कुत्र्याला वाचवण्यात आले आहे.

जम्मू विभागीय आयुक्त रमेश कुमार यांच्या मते, आतापर्यंत जम्मू विभागातून 5 हजार नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. रात्री कुठूनही ढगफुटीची कोणतीही घटना घडलेली नाही. प्रशासन, पोलिस आणि सैन्य सतर्क आहेत. चिनाब नदीची पाण्याची पातळी अजूनही जास्त आहे.