Operation Sindoor वर विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमारेषेवर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाकिस्तानने 8-9 मेच्या रात्री हिंदुस्थानवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानचे सर्व हल्ले हिंदुस्थानने परतवून लावले. यानंतर हिंदुस्थानने काऊंटर अटॅक सुरू करत पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई सुरू केली. या संकटाच्या परिस्थितीत प्रत्येक देशवासिय लष्कराच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटींनी लष्कराच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या आहेत. टीम इंडियाचा रनमशीन विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांनीही यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही आमच्या सशस्त्र दलांच्यासोबत एकजुटीने उभे असून या कठीण काळामध्ये देशाचे रक्षण केल्याबद्दल त्यांना सलाम करतो. जवानांच्या शौर्याबद्दल आपण त्यांचे सदैव ऋणी राहू. या शूरविरांनी आणि त्यांच्या कुटुंबियांना देशासाठी दिलेल्या त्यागाबद्दल मानपासून कृतज्ञता व्यक्त करतो. जय हिंद! अशी स्टोरी विराट कोहली याने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

तर रोहित शर्मा याने आपल्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणतो, प्रत्येक क्षणासोबत, घेतलेल्या निर्णयासोबत मला आपल्या हिंदुस्थानी सैन्याचा, वायू दलाचा आणि नौदलाचा खूप अभिमान वाटत आहे. आपले शूर जवान देशाच्या स्वाभिमानासाठी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे प्रत्येक देशवासियाने जबाबदारीचे भान राखणे आणि फेक न्यूज पसरवणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे टाळणे महत्त्वाचे आहे. सर्वांनी सुरक्षित रहावे!

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह म्हणतो, आपल्या सशस्त्र दलांच्या धाडस आणि शौर्यादबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी ते जे काही करतात त्यासाठी आमचा त्यांना सलाम आणि कायम त्यांच्या ऋणात राहू.