
मिंधे गटाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत याचा प्रेम, दुसरे लग्न आणि धोका देण्याचा प्रताप उघडकीस आला आहे. एका विवाहित महिलेचा मानसिक छळ आणि आत्महत्येची धमकी देऊन लग्न केले. एवढेच नाही तर सिद्धांत याने आपला शारीरिक छळ करून मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत जान्हवी नामक महिलेने वकील अॅड. चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत मंत्री पुत्राला नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान सकाळी आरोप करणाऱ्या या विवाहितेने संध्याकाळी पुणीही याचे राजकारण करू नये. मी या प्रकरणाला फुलस्टॉप देते, असे माध्यमांपुढे येऊन सांगत आरोप मागे घेतले.
मंत्री पुत्र सिद्धांत शिरसाट याने चेंबूर येथील त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या फ्लॅटमध्ये पीडित महिलेशी लग्न केले. दोन वर्षे ते चांगले राहिले, पण नंतर तिसऱ्याच मुलीशी त्यांचे अफेअर सुरू झाले. यामुळे त्यांनी पीडितेकडे दुर्लक्ष करत तिचा मानसिक छळ सुरू केला. तिने पुठे तक्रार दाखल करू नये म्हणून सिद्धांत शिरसाटने स्वतःच्या डोक्याला बंदूक लावत तिला धमकावले. त्यांनी पीडितेला छत्रपती संभाजीनगरला आल्यास तुझे तंगडे तोडू अशी धमकी तिला दिली. त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस पाठवून पीडितेला 7 दिवसांच्या आत नांदण्यास घेऊन जाण्याचा इशारा दिला आहे.
सदर प्रकरणात महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर तीन केस दाखल करणार असल्याची माहिती पीडित महिलेचे वकील अॅड. चंद्रकांत ठोंबरे यांनी मंगळवारी सकाळी माध्यमांशी बोलताना दिली. सायंकाळी जान्हवी नामक पीडित महिलेने मी माझ्या वकिलांना नोटीस मागे घेण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले.
…तर कारवाई व्हावी – अंबादास दानवे
कोणीही अशा प्रकारची महिलेची फसवणूक केली तर निश्चितच त्याच्यावर कारवाई व्हावी. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलेन. जर मंत्रीपदाचा गैरफायदा घेतला जात असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
महिला आयोग आताही गप्प का? – इम्तियाज जलील
एका मंत्र्याच्या मुलाने तिसरे लग्न केले आणि ज्या मुलीशी लग्न केले त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे. महिला आयोग आताही गप्प बसणार आहे का, असा सवाल माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला.