World Milk Day : नीर–क्षीर विवेकी ‘राजहंस’

>> रणजीतसिंह देशमुख

पूर्णान्न दुधातील केवळ सत्त्व शोषून घेण्याची अलौकिक किमया ज्या पक्ष्याला साध्य आहे त्याला सार्थपणे राजहंस म्हटले जाते. 1977 साली स्थापन झालेल्या संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाने आपल्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना राजहंस या ब्रँड नावाने 1992-93 बाजारात आणण्यास सुरुवात केली. त्यात संस्थापक भाऊसाहेब संतुजी थोरात (दादा) या असामान्य कर्तृत्वाच्या व्यक्तिमत्वाचा द्रष्टेपणा आहे.

सुवर्ण महोत्सवाच्या दारात पोहचण्यास दोनच पाऊले शिल्लक असलेला ‘राजहंस’ हा आज बहुराज्यीय ब्रँड बनला असून तो अवर्षणगस्त संगमनेर तालुक्यातील शेतकऱयांसाठी संजीवनी ठरला आहे. तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱयांच्या गोठय़ांत आज कमीत-कमी पाच गायी आहेत. दुधातून दर आठवडय़ाला मिळणाऱया उत्पन्नाने हा शेतकरीदेखील सधन झाला आहे. भाऊसाहेबांची दूरदृष्टी अशी व्यापक होती याचा प्रत्यय संगमनेरमधील शेतकऱयांच्या जीवनमानात झालेल्या लक्षणीय बदलातून तसेच संगमनेर तालुक्यातील आर्थिक विकासातूनही येतो. दरवर्षी दिवाळीपूर्वी ‘राजहंस’ला दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱयाला प्रति लिटर किमान एक रुपयाप्रमाणे वर्षभरात पुरवठा केलेल्या लिटर इतकी रक्कम ‘राजहंस’ बोनसच्या (लाभांश) रूपात देतो. 2014 च्या दिवाळीपूर्वी सुमारे 15,000 कुटुंबांना 11 कोटी 75 लाख रुपयांचे वाटप केले गेले. दूध उत्पादक शेतकऱयांची दिवाळी सर्वार्थाने सुखाने साजरी होत असताना कित्येक शतके जुन्या असलेल्या संगमनेर बाजारपेठेत त्यामुळे कोटय़वधींची उलाढाल होत असते.

संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाची 48 वर्षांची वाटचाल देदीप्यमान यशाची असली तरी या वाटचालीची वाट सहजसाध्य नाही. अनेक खाचखळग्यातून जाताना भाऊसाहेबांच्यानंतर त्यांचे सुपुत्र बाळासाहेब थोरात, त्यानंतर केरूजी हरूजी गुंजाळ, बाजीराव पाटील खेमनर, लक्ष्मणराव कुटे, रामनाथ राहाणे आणि रणजितसिंह देशमुख अशा मातब्बरांनी दूध संघाच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे वाहिली आहे. आपापल्या कारकीर्दीत या प्रत्येकाने मैलाचे खांब रोवले आहेत. राजहंस संघाने संचालक मंडळात महिलांनाही प्रतिनिधित्व दिले आहे. 1992-93 या वर्षी पहिल्या महिला संचालिका म्हणून अलकाताई जोंधळे आणि यमुनाबाई कानवडे या महिलांची संचालक मंडळावर नेमणूक करण्यात आली.

दुग्धजन्य उत्पादने

दूध संघाची विकासदर्शी परिमाण रेखा वर वर चढू लागली. 1986-87 या आर्थिक वर्षात दूध संघाने पहिल्यांदा पॉलिथीन पिशवीतून दूध विकी सुरू केली. दूध संघाच्या बाळाने बाळसे धरेपर्यंत भाऊसाहेबांनी डोळय़ांत तेल घालून त्याची देखभाल केली. मूळच्या दुष्काळसदृश परिस्थितीतील प्रदेशात शेतकऱयांना अन्नधान्य पिकवायला पुरेसे पाणी नसतांना गुरांसाठी चारा कसा पिकवणार! अशा परिस्थितीत दूध संघ सुरू करणे म्हणजे डोक्यावर केस नसणाऱयांस पंगवा विकण्यासमान होते. अवर्षणाचा फटका तर शेतकऱयांना बसत होताच. भाऊसाहेबांच्या हाती जिल्हा सहकारी बँकेची सूत्रे आली तेव्हा त्यांनी प्रवरेचे पाणी उचलण्यासाठी कर्जवाटप केले. गुरांना हिरवा चारा मिळू लागला आणि दूध संघाला दूध.

दूध संकलन वाढले तसेच राजहंसच्या दुग्धजन्य उत्पादनांना सुरुवात झाली. 1997 साली राजहंस पेढा बाजारात आला. याची पूर्वतयारी संघाने एक वर्ष आधीच केली. 1996-97 मध्ये दूध संघाने नाशिक विभागीय उपनिबंधक, (दुग्ध विभाग) यांच्याकडे संस्थेच्या नावात बदल (सुधारणा) करण्याची परवानगी मागितली. संस्थेस परवानगी मिळाली आणि दूध उत्पादक संघ ‘संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रकिया संघ’ झाला. गायींच्या मुबलक चाऱयाची सोय झाल्यानंतर राजहंस संघाने अधिक दूध देणाऱ्या गायींच्या पैदासीकडे आपला मोर्चा वळविला. कृत्रिम रेतन केंद्र, दूध उत्पादन वाढीस पूरक खाद्यनिर्मिती, सुदृढ गायींच्या देखभालीसाठी तरुणांना प्रशिक्षण यासारखे उपकम राजहंसने राबविले. ज्यात चांगले यशही आले. या टप्प्यावर पारंपरिकतेकडून पशुसंवर्धनाच्या आधुनिक उपायांना सुरुवात झाली होती.

‘मूरघास’ योजना

राजहंस दूध संघाची सूत्रे 2015 साली माझ्या हाती आली. तीन महत्त्वाकांक्षी उपकम मी टप्याटप्याने यशस्वीरीत्या कार्यान्वित केले. उन्हाळय़ात संगमनेर तालुक्यात पाण्याची तीव टंचाई असते या काळात गायींना चारा कोठून आणायचा ही फार मोठी समस्या असते. या समस्येवर मात करण्यासाठी ‘मूरघास’ ही योजना राबविली. मक्याचे बारीक तुकडे त्यात अन्य पोषक घटक मिसळून मूरघास तयार केला जातो. तो मोठय़ा पिशव्यांमध्ये भरून ठेवला जातो, तसाच उन्हाळय़ासाठीही साठविला जातो. यामुळे गायींना पोषक आहार वर्षभर उपलब्ध होतो.

मी पुढचे पाऊल उचलले ते मुक्त गोठय़ाचे पारंपरिक गोठय़ात गायींना एकाच जागी बांधून ठेवले जाते. त्यामुळे गायींच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. मुक्त गोठय़ात गायींसाठी कुंपण घातलेली मोकळी जागा असते. तिथेच त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली असते. दूध काढताना व रात्रीच फक्त गायींना बांधून ठेवले जाते. दिवसा चारा-पाणी देऊन गायी मुक्त गोठय़ात संचार करतात. या गोठय़ामुळे गायींचे आरोग्य सुधारले व त्यांच्या दूध क्षमतेत वाढ झाली. मी मुक्त गोठय़ाचे आधुनिकरण केले. त्यामुळे उन्हाळय़ात उष्म्यापासून गायींचे रक्षण होऊ लागले.

मिशन 50 लिटर

महाराष्ट्रात पंजाब पॅटर्न आणण्यासाठी मी मिशन 50 लिटर ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यास सुरुवात केली. पंजाबमध्ये दिवसाला 50 लिटर्सपर्यंत दूध देणाऱया गायी आहेत. अशा गायी पंजाबमधून आणल्या तर येथील प्रतिकूल हवामानाला त्या तग धरत नाहीत. काही महिन्यांनी त्या दगावतात. पिढी-दर-पिढी गणिक अधिक दूध देणाऱया गायींची पैदास करण्यासाठी सशक्त कालवडींची निवड करून त्यांच्यात उत्तम प्रतिच्या सशक्त वळूचे कृत्रिम रेतन करून प्रतिदिन 50 लिटर दूध देणाऱ्या गायींची प्रजाती, नवी पिढी घडविणे हे ‘मिशन 50 ली’चे उद्दिष्ट आहे.

एप्रिल 2023 पासून हे मिशन सुरू झाले आहे, 2028-29 पर्यंत हे मिशन पूर्ण होणार आहे. या मिशन अंतर्गत 250 शेतकऱयांची निवड करण्यात आली आहे. या शेतकऱ्याकडे प्रत्येकी किमान पाच सशक्त गायी आहेत. या सर्व गायींची विशेष देखभाल करण्यासाठी एका पशुवैद्यक तज्ञांच्या नेतृत्वाखाली 25 प्रशिक्षित डॉक्टर्सची नेमणुक करण्यात आली आहे. प्रत्येक गायीची नियमित तपासणी केली जाते. तिला ठराविक आहार दिला जातो. तसेच निवड केलेल्या गायींसाठी सिध्द वळूच्या सिमेन्सचा वापर करून उच्च प्रतीच्या कालवडी दूध उत्पादकांच्या गोठय़ात तयार होणार आहेत. त्या कालवडींची विशेष देखभाल करून त्यांना मिल्क रिप्लेसर व इतर आवश्यक खाद्य दिले जाईल व वेळेवर जंतनिर्मूलन केले जाईल. अशा प्रकारे कालवडीचे संगोपन केल्यानंतर दोन वर्षांनंतर एक नवी पिढी तयार होईल. प्रत्येक पिढीत दूध क्षमता वाढत जाईल. पाच वर्षांनतर या योजनेतील पिढी दिवसात 50 लिटर दूध देईल. हा उपकम पुढेही सुरू राहील. दूध उत्पादन क्षेत्रात या मिशनमुळे महाराष्ट्र अग्रेसर असेल. एका नव्या धवलक्रांतीकडे महाराष्ट्र वाटचाल करीत आहे.