
रत्नागिरीतील सरकारी कंत्राटात झालेल्या डांबर घोटाळ्याबाबत माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या डांबर घोटाळ्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली आहे. सुनावणीची पुढील तारीख 9 एप्रिल आहे. या डांबर घोटाळ्याप्रकरणात आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन प्रा.लि. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रत्नागिरी नगर परिषदेवर ठपका ठेवण्यात आला आहे.
माजी नगराध्यक्ष मिलींद कीर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सरकारी बांधकामासाठी करण्यात आलेल्या खरेदी प्रक्रीयेत संभाव्य त्रूटी झाल्याचे उपस्थित केले होते. आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन या कंत्राटदार कंपनीने एकाच खरेदी चलनाचा वापर करून वेगवेगळ्या सरकारी कामांसाठी बिले मंजूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी हा डांबर घोटाळा अधिवेशनातही उघडकीस आणला होता. माजी नगराध्यक्ष मिलींद कीर यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु झाली असून महाराष्ट्र सरकार आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना चार आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. पुढील सुनावणी 9 एप्रिल रोजी होणार आहे.