सांगली जिल्ह्यातील 104 गावांना पुराचा धोका, जिल्हा परिषद, महसूल, जलसंपदा विभाग लागले कामाला

यंदा भर उन्हाळ्यातच पावसाने धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यातील १०४ गावांत पुराची धास्ती निर्माण झाली आहे. संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर त्याचा मुकाबला करण्यासाठी १०४ गावांना सज्ज ठेवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा, इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे, आरोग्य विभागाने साथीच्या रोगाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी पूरबाधित गावांमध्ये निवारागृहांचे नियोजन केले जात आहे. संभाव्य आपत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, याची दक्षता घेत जलसंपदा, महसूल विभाग आणि आरोग्य विभाग कामाला लागल्याचे चित्र आहे.

मागील सहा वर्षांत जिल्ह्याला दोन वेळा महापुराचा सामना करावा लागला होता. सातत्याने येणाऱ्या महापुराने शेतीसह घर आणि पशुधनाचेही मोठे नुकसान झाले. पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निश्चित केलेल्या १०४ पूरबाधित गावांतील पूर आराखडे तयार केले आहेत. यंदा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर १०० टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला असला, तरी पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. संभाव्य पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करणे आवश्यक ठरल्यास पूरबाधित गावांमध्ये निवारागृहांची उपलब्धता ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

पूर परिस्थितीत पूरग्रस्तांना अन्य ठिकाणांहून येणाऱ्या मदतीचे सनियंत्रण करण्यासाठी अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. संभाव्य पुरामुळे बाधित होणारी जनावरे यांची माहिती पशुसंवर्धन विभागाने संकलित करावी. या जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्धतेबाबत कृषी विभागाने नियोजन केले आहे. यासाठी जिल्ह्यात ज्या ठिकाणी चारा पैदास केला जातो, याची माहिती कृषी विभाग तयार करीत आहे.

पूरबाधित गावांच्या कार्यक्षेत्रात १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. वाळवा प्राथमिक आरोग्य केंद्राने त्याअंतर्गत येणाऱ्या गावांचे डेंग्यूचे सर्वेक्षण केले आहे. पुराचा धोका असणाऱ्या गावांतील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. संभाव्य पूर परिस्थितीत आवश्यक ती आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. साथीच्या रोगांबाबत सतर्कता बाळगावी. पूर परिस्थिती, वादळी वारे, साथीचे रोग, पर्यायी मार्ग औषधसाठा, अन्नधान्य वितरण, वाहतूक व कायदा सुव्यवस्था, विद्युत पुरवठा, पशुधनाचे लसीकरण, औषधाचा साठा व चारा याबाबतीत संबंधित विभागाकडून आराखडा तयार केला जात आहे.

आपत्ती व्यवस्थापन साहित्याची दुरुस्ती 

पूरग्रस्त गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनामार्फत आवश्यक साहित्य पुरवले आहे. या साहित्याची तज्ज्ञांकडून तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात येत आहे. गाव समित्या सक्रिय कराव्यात. पूर परिस्थिती उद्भवल्यास स्थलांतराची प्रक्रिया गतीने राबविण्यास मदत होईल. बाधित क्षेत्रात बोट उपलब्ध आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने ऑडिट पूर्ण करावेत. पुरामुळे पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी बॅरिकेटिंग, रिफलेक्टर अशी साधनसामग्री तयार ठेवावी. त्यामुळे संभाव्य धोके टळेल.

पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था 

पूरग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी. आवश्यक तेथे टैंकर सुरू करण्यासाठी नियोजन केले आहे. त्याबाबत ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्वय साधून पिण्याच्या पाण्याची यंत्रणा तयार ठेवली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व पाणी साठवण तलाव याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

आपत्तीत वीजपुरवठा सुरळीत होणार 

महावितरणने ट्रान्स्फॉर्मर खराब झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी पथके गठीत करावीत. आपत्तीच्या काळात विद्युतपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याचे नियोजन करावे. संभाव्य पूर परिस्थितीत पोलीस विभागाने आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवावा, याबाबतचे नियोजन जिल्हा प्रशासनस्तरावर करण्यात येत आहे.