
त्रिपुराहून अमरनाथ यात्रेत तैनातीसाठी जम्मूला जाणाऱ्या सुमारे 1200 बीएसएफ जवानांना नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेने (एनएफआर) अत्यंत अस्वच्छ ट्रेन उपलब्ध करून दिली. या ट्रेनची अवस्था इतकी दयनीय होती की, जवानांनी त्यात चढण्यास स्पष्ट नकार दिला. हा प्रकार 6 जून 2025 रोजी घडला.
तुटलेल्या खिडक्या आणि गलिच्छ टॉयलेट्स
बीएसएफच्या कंपनी कमांडरने ट्रेनची पाहणी केली असता, त्यांना डब्यांची अत्यंत वाईट अवस्था आढळली. ट्रेनच्या डब्यांमध्ये खिडक्या तुटलेल्या होत्या, दरवाजे खराब होते. सीटांवर गाद्या फाटक्या होत्या आणि टॉयलेट्स गलिच्छ होते. अनेक डबे कित्येक महिन्यांपासून वापरात नसल्याचे दिसून आले. या परिस्थितीमुळे जवानांनी प्रवास करण्यास नकार दिला.
जवानांचा विरोध आणि रेल्वेची प्रतिक्रिया
जवानांनी ट्रेनमध्ये चढण्यास नकार दिल्याने हा मुद्दा रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. बीएसएफने रेल्वेविरोधात तीव्र निषेध नोंदवला. रेल्वेच्या प्रवक्त्या दिलीप कुमार यांनी सांगितले की, एनएफआरने चुकून काही जुन्या डब्यांचा समावेश या विशेष ट्रेनमध्ये केला होता, जे नूतनीकरणासाठी पाठवले जाणार होते. ही चूक लक्षात येताच रेल्वेने तातडीने उपाययोजना केल्या आहेत.