शुभमंगल सावधान! शरण आलेले 13 नक्षलवादी लग्नाच्या बेडीत! मुख्यमंत्री फडणवीस यजमान, पोलीस बनले वऱ्हाडी

गडचिरोलीत आज शरण आलेले 13 नक्षलवादी लग्नाच्या बेडीत अडकले. या लग्नासाठी राज्याचे मुख्यमंत्री खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी यजमान बनून नवदांपत्यांना आशीर्वाद दिले. तर पोलिसांनीही वऱ्हाडय़ांची भूमिका पार पाडली. या सोहळ्याच्या निमित्ताने गडचिरोली पोलीस दलाच्या बँड पथकाने आपल्या मुख्यालय परिसरातून वधू-वरांची वाजतगाजत मिरवणूक काढली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दौऱ्यात जिह्याच्या शेवटच्या टोकावर जाऊन स्थितीचा आढावा घेतला. या वेळी बोलताना त्यांनी आपल्याएवढा दुसरा कोणताही मुख्यमंत्री गडचिरोलीत फिरला नाही, असा दावाही त्यांनी केला. या वेळी बोलताना ते म्हणाले, आपण आता महाराष्ट्राच्या पहिल्या पॉईंटवर आलो आहोत. छत्तीसगड अगदी आपल्या नजरेस दिसेल एवढय़ा जवळ आहे. कवंडेच्या पोलीस आऊटपोस्टमुळे या भागातील सुरक्षेचा एक मोठा बॅकलॉग भरून निघाला आहे. हा भाग आजपर्यंत अनकनेक्टेड होता, असेही त्यांनी सांगितले. गडचिरोलीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले सुरक्षा जवान चांगले काम करत आहेत. या सुरक्षा यंत्रणांचे मनोधैर्य वाढावे म्हणून मी अशा दुर्गम आऊटपोस्टवर येत असतो, असेही ते या वेळी म्हणाले.

लोकांचा सरकारवरील विश्वास वाढेल

आता इथे पोलीस आल्यामुळे शासनाच्या सर्व योजना, त्यांचे लाभ लोकांना मिळतील. लोकांचा सरकारवरील विश्वास वाढेल. सध्या हा संपूर्ण भाग पोलीस व शासनाच्या अधिपत्याखाली आला आहे. आता माओवाद्यांना इथे कोणतीही कारवाई करता येणार नाही. सरकार लवकरच गडचिरोलीतील माओवाद पूर्णतŠ संपुष्टात आणेल. आता आपल्याला इथे औद्योगिक विकास साधताना येथील जंगल व जमीन वाचवून विकास साधायचा आहे. या प्रकरणी गडचिरोलीचा नैसर्गिक स्वभाव बदलण्याचा प्रयत्न होणार नाही, असे ते म्हणाले.