
देशभरातील बँकांमध्ये हजारो कोटींच्या ठेवी पडून आहेत. या पैशांवर आजतागायत कुणी दावा केलेला नाही. पेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँक रेग्युलेटर्स आणि बँकिंग विभागाला पैसे कुणाचे आहेत, याची माहिती घेण्यास सांगितले. सामान्य लोकांचे हित लक्षात घेऊन ज्यांचे हे पैसे आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सरकारने पावले उचलण्याचे निर्देश दिले. आतापर्यंत दावा न केलेले पैसे त्यांच्या मालकाला परत देण्यास आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. बँकेत पडून पैशांचा शोध घेण्यासाठी आणि ते त्यांच्या मालकांना परत देण्यासाठी सरकार एक मोठी मोहीम हाती घेणार आहे. अर्थमंत्र्यांनी प्रत्येक जिह्यात विशेष शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले. ही मोहीम केवळ बँकांपुरती मर्यादित नसून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी (शेअर बाजाराचे नियामक), कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, पेन्शन फंड नियामक आणि विमा नियामक यांच्या समन्वयाने चालवली जाईल. याचा अर्थ केवळ बँकांमधील ठेवीच नव्हे, तर दावा न केलेले शेअर्स, लाभांश, विमा पॉलिसीचे पैसे आणि पेन्शन फंड यांचाही यात समावेश आहे.
बँकांमध्ये किती पैसे पडून?
आरबीआयच्या ताज्या अहवालानुसार, मार्च 2024 पर्यंत बँकांमध्ये तब्बल 78,213 कोटी रुपये असेच पडून आहेत, ज्यावर कोणीही दावा केलेला नाही. यामध्ये मागील वर्षभरात 26 टक्के वाढ झाली आहे.
केवायसी प्रक्रिया होणार सोपी
नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अर्थमंत्र्यांनी ‘केवायसी’ प्रक्रिया सुलभ करण्यावर विशेष भर दिला आहे. विशेषतः परदेशात राहणाऱया नागरिकांसाठी (एनआरआय) शेअर बाजारात गुंतवणूक करणे आणि इतर आर्थिक व्यवहार करणे सोपे व्हावे यासाठी डिजिटल लिंकिंगसह केवायसी नियमांमध्ये सुधारणा करण्याची गरज अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली.