सीतास्वरुपा – सर्वगुणसंपन्न सीता

>> वृषाली साठे

सीतामाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडताना अनेक प्रश्नांची उत्तरे या कथेमार्फत आपल्याला मिळताना दिसतात. गुणवर्णन ऐकताना आपण त्या गुणांना स्वतमध्ये आकर्षित करतो. सीतामाईचे हे विविध पैलू मीनाक्षी म्हणजेच लेखिका डेना मॅरिअम, ज्या पूर्वजन्मी सीतामाईच्या दासी होत्या, त्यांच्याकडून जाणून घेत आहोत.

आपण पाहिलं की, सीतामाईचा जन्म संपूर्ण पृथ्वीसाठी झाला. जनकबाबा आणि सुनयना मातेची ती लाडकी लेक होतीच. पण सर्व मिथिलावासीही तिच्यावर खूप प्रेम करत होते. कारणही तसेच होते. सीतामाईचा पायगुणच चांगला होता. मिथिलेतील दुष्काळ संपला होता. अन्नधान्याची कमतरता नव्हती. सर्वत्र सुखसमृद्धी भरून वाहत होती. राजवाडय़ात तर सगळे सतत सीतामाईच्या अवतीभवती राहण्याचा प्रयत्न करायचे. एक गंमत होती की, या लहान बाळाची प्रभाव इतका विलक्षण होता की सर्वजण तिला सीतामाई म्हणूनच हाक मारायचे. बाळ इतके अद्भुत होते की जे जनकबाबा जंगलात ऋषी मुनींच्या सहवासात त्यांचा वेळ जास्त घालवायचे ते आता बाळ घरी आल्यापासून एक वर्ष कुठे बाहेरच गेले नाहीत. अर्थात जगन्माता नारायणीच्या बाळलीला बघण्याचे सौख्य कोणी का सोडेल?

पण जेव्हा सीतामाई एक वर्षाची झाली, तेव्हा मात्र एक दिवस जनकबाबा जंगलात ऋषींच्या आश्रमात जायला निघाले. सीतामाईने त्यांच्या पायाला मिठी मारली व नंतर आपले दोन्ही हात उंचावून मला पण घेऊन चला असे म्हणू लागली.

सुनयना मातेला इतक्या लहान मुलीला जंगलात जाऊ द्यावे हे काही बरोबर वाटेना. सीतामाईचे मन दुखवायला नको असे बाबांनी समजावले. जेव्हापासून सीतामाई राजवाडय़ात आल्या तेव्हापासून बाबांनी मीनाक्षीला सीतामाईची देखभाल करण्याचे काम दिले. त्यामुळे जनकबाबा आणि सीतामाईसोबत मीनाक्षीदेखील जंगलात गेली.

जनक महाराज ऋषींबरोबर विचारविनियम करत एका कुटीमध्ये होते. तर एक वर्षाच्या सीतामाईंना सांभाळत मीनाक्षी दुसऱया कुटीमध्ये होती. मीनाक्षीला मध्येच डोळा लागला. उठल्यावर बघते तर सीतामाई तिथे नव्हत्या. ती धावत हे जनकबाबांना सांगायला गेली तर तिथे तिने पाहिले की जनकबाबांच्या शेजारी जमिनीवर सीतामाई झोपून गेली आहे. जनकबाबा म्हणाले की, ती स्वत चालत इथे आली आणि माझ्या व ऋषींच्या चर्चा ऐकत झोपून गेली. एक वर्षाचे बाळ पण किती शांतपणे चर्चा ऐकत होते. बाळाचे पाय पाळण्यात दिसत होते, कारण ती प्रत्यक्ष नारायणी होती. केवळ पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी तिने मानवी जन्म घेतला होता.

जेव्हा जेव्हा जनकबाबा जंगलात जायचे तेव्हा तेव्हा सीतामाई त्यांच्याबरोबर जायच्या. एकदा अशाच सीतामाई 2-3 वर्षांच्या असताना जंगलात गेल्या असताना त्या एका झाडाकडे बोट दाखवून जनकबाबांना काही सांगू पाहात होत्या. जनकबाबांना समजेना, पण जवळ जाऊन बघितले तर एक पिल्लू जखमी अवस्थेत पडले होते. सीतामाईने त्याला उचलून घेतले. सीतामाईला प्रकृतीमधील प्रत्येकाचे दुःख जाणवायचे व ते दुःख दूर करायला त्या धडपड करायच्या.

आजकाल आपण आत्मकेंद्री बनत चाललो आहोत. ही अशी संवेदनशीलता आपल्यात नाही तर आपण लहान मुलांना काय शिकवणार? लहानपणापासून सीतामाई ध्यान करायच्या. खूप आनंद झाला असेल तरी ध्यान. दुःख झाले तरी ध्यान. ध्यान करून त्या प्रकृतीशी सतत कनेक्ट करायच्या. ही गोष्ट आज खूप महत्त्वाची आहे. प्रत्येकाने रोज सुरुवातीला किमान 10 मिनिटे जरी मेडिटेशन करायला हवे. मानसिक शक्तीचा विकास केवळ ध्यानाने होतो.

एकदा अशीच सीतामाई मीनाक्षीबरोबर जंगलात गेली होती. पण आश्रमात न जाता ती जंगलाकडे पळत गेली. पाठोपाठ मीनाक्षी तर होतीच. ती एका पक्ष्यांच्या थव्याजवळ गेली. त्यांच्याशी बोलू लागली. बोलून झाल्यावर पुन्हा जंगलात गेली. तिथून तिने औषधी वनस्पती आणली. जनकबाबांनी त्याबद्दल विचारताच ती म्हणाली की, आश्रमातल्या एका ऋषींचे पोट खूप दुखत होते. म्हणून ती औषधी वनस्पती आणायला जंगलात गेली. त्याची माहिती पक्ष्यांनी तिला दिली. ज्या ऋषीचे पोट दुखत होते त्यांनाही खूप आश्चर्य वाटले. कारण त्यांचे पोट दोन दिवसांपासून दुखत होते आणि त्यांनी कोणीलाही ते सांगितले नव्हते.

जनकबाबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते समजून गेले की ही नारायणी या जगातील दुःख दूर करायला आली आहे. हे माझे परम भाग्य की मी हिचा पिता आहे. यातून आपल्याला सीतामाईचे व्यक्तित्व उलगडत जाते. कशा प्रकारे त्या प्रकृतीशी कनेक्टेड होत्या. कोणी न सांगताही त्यांना दुसऱयांचे भाव समजत होते. त्यांना फक्त माणसांशीच नाही, प्राणी, पक्षी, झाडे, निसर्गाशीसुध्दा संवाद साधता यायचा.

अजून एक प्रसंग मीनाक्षी सांगते. एकदा सीतामाईला जंगलात जाऊन खूप वेळ झाला. ती परत आली नाही म्हणून जनकबाबा आणि मीनाक्षी शोधायला गेले. तर जंगलात एका झाडाखाली एका मोठय़ा माकडिणीच्या मांडीवर सीतामाई डोके ठेवून झोपली होती. त्या दोघांना बघताच माकडीण पळून गेली. सीतामाईना विचारले तर तिने सांगितले की, या माकडिणीचे पिल्लू काल झाडावरून पडून मेले. ती खूप दुःखी होती. म्हणून सीतामाई तिला सांत्वना देत होती. ते बघून जनकबाबांच्या डोळ्यातून पाणी आले. बघा सीतामाई दुसऱयाचे दुःख बघू शकत नाही.

आज आपण हे प्रकृती (निसर्ग) बरोबरचे कनेक्शन हरवून बसलो आहोत. `अन्टोल्ड स्टोरी आाफ सीता’ या पुस्तकाच्या निमित्ताने आपण मनाने प्रकृतीच्या जवळ गेलो तर सीतामाईला ते खूप आवडेल. सीतामाई एकदा आठ-नऊ वर्षांची असताना तिला आणि जनकबाबांना एका आश्रमाच्या उद्घाटनासाठी बोलवले होते. सीतामाई आश्रमात यायला तयारच होईनात. सगळे ऋषी-मुनी विचारायला लागले की तुम्ही आत का येत नाही? त्यावर सीतामाई म्हणाल्या की, हा आश्रम बांधताना तुम्ही किती झाडे तोडलीत? प्रकृतीचा नियम आहे, तुम्ही जेवढे प्रकृतीकडून घ्याल त्याच्या दुप्पट तुम्हाला प्रकृतीला द्यावे लागेल. म्हणजे जेवढी झाडे तोडाल, त्याच्या दुप्पट झाडे तुम्हाला लावावी लागतील. बघा आजच्या काळात आपण एवढा विचार तरी करतो का? आपल्याला फक्त घ्यायचे माहीत आहे. सीतामाई त्या काळात शिकवत होती की, प्रकृतीकडून कधीही काहीही फुकट घेऊ नये.

यानंतर या कहाणीत एका महत्त्वाच्या पात्राचा प्रवेश होतो, आणि तो म्हणजे सोमा. सोमा सीतामाईपेक्षा एक-दोन वर्षांनी मोठी असेल. ती जेव्हा काम मागण्यासाठी राजवाडय़ात आली तेव्हा जनक बाबांनी तिला सीतामाईची सखी म्हणून काम करायला सांगितले. सोमा आणि सीतामाई यांच्यातला संबंध अद्वितीय होते. दोघींनाही एकमेकांच्या मनातले काही न सांगता कळायचे. सीतामाईंना गोड खावेसे वाटले तर सोमा गोड बनवायची. सीतामाईंना एखादे फळ खावेसे वाटले की सोमा ते फळ त्यांच्यासमोर आणून ठेवत असे. त्या दोघींचा संबंध अद्वितीय होता. आजकाल आपण ज्याला मेंटल टेलिपथी म्हणतो, अगदी तसेच. जशी कथा पुढे जाते तेव्हा सोमा हे पात्र किती महत्त्वाचे आहे हे कळत जाते.

जशी जशी सीतामाई मोठी होत गेली, तसे ती ध्यानाला जास्त महत्त्व द्यायला लागली. तिला जंगलात जाऊन ध्यान करायला फार आवडायचे. आज आपण लोकतंत्र, प्रजातंत्र हे शब्द वापरतो पण 7000 वर्षांपूर्वी सीतामाई आणि जनकबाबांनी मिथिलेत स्वशासनाचा पाया रचला. प्रत्येक गावात पंचायत असली पाहिजे. तिथली लोकंच आपला प्रतिनिधी निवडून समितीमार्फत गावात सुव्यवस्था व शासन उत्कृष्टपणे करण्याची संकल्पना सीतामाई आणि जनकबाबांनी आणली. आपल्याला रामायणात सीतामाईबद्दल एवढे माहीत नव्हते. सीतामाईची निर्णयक्षमता व प्रत्येक जिवाबद्दल असलेला कळवळा यासारख्या गोष्टी सीतामाईची नवीन ओळख करून देतात.

ज्याप्रमाणे सीतामाईंना ध्यान आवडायचे, त्याप्रमाणे जेवण बनवून प्रेमाने दुसऱयाला खाऊ घालणे ही गोष्ट त्यांना खूप आवडायची. वेगवेगळय़ा भाज्या, कंदमुळे, वनस्पती यांचा वापर करून त्या उत्कृष्ट स्वयंपाक करायच्या. अन्नापासून मन बनते. त्यामुळे सात्त्विक जेवणावर त्यांचा भर असायचा. सर्व शास्त्र व शस्त्रविद्या त्यांना गुरुकुलात जात असल्याने येत होत्या. त्या सर्व वडीलधाऱया मंडळीची सेवा करायच्या आणि लहान बहिणींची काळजी घ्यायच्या. धर्म, अर्थ, काम, मोक्ष याप्रमाणे पाचवा पुरुषार्थ प्रेम हा आहे. आणि हे प्रेम काय असते हेच आपण सीतामाईकडून शिकतो.