
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी केली आहे. सिंधू जलकरार रद्द करत पहिला मोठा धक्का दिला. त्यानंतर आता दुसरा वॉटर स्ट्राईक केला असून चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह रोखला आहे. तसेच झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचेही पाणी थांबवण्याचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
जम्मूतील रामबन येथील बगलिहार धरण आणि उत्तर कश्मीरमधील किशनगंगा धरणाद्वारे पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचे नियमन हिंदुस्थान करू शकतो. म्हणजेच या धरणांद्वारे पाकिस्तानला जाणारे पाणी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय थांबवता येते किंवा प्रवाह वाढवता येतो. तरीही बागलिहार धरण हा दोन्ही देशांमधील दीर्घकाळापासून वादाचा विषय आहे. पाकिस्तानने यावर जागतिक बँकेकडून मध्यस्थीची मागणी केली होती. किशनगंगा धरणाचाही असाच वाद आहे.
– पाकिस्तान सिंधू नदीतील 93 टक्के पाणी सिंचन आणि वीजनिर्मितीसाठी वापरतो. पाकिस्तानची सुमारे 80 टक्के शेतजमीन आणि याच पाण्यावर अवलंबून आहे. शेती हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे हिंदुस्थानने सिंधू करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान सातत्याने युद्धाच्या धमक्या देत आहे.