
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. दुरुस्तीच्या नावाखाली दहा तास बत्तीगुल होत असल्याने व्यापारी व लघुउद्योजकांना नुकसानीचा ‘शॉक’ बसला आहे. वीजच नसल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होत असून व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे. संतप्त व्यापारी व लघुउद्योजकांना वीज वितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यांनी आक्रमक पवित्रा घेताच महावितरण ताळ्यावर आले असून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या सर्व यंत्रणा तातडीने उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
अवकाळी पावसामुळे शहापूर शहरासह तालुक्यात बत्तीगुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. सततच्या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांसह व्यापारी व लघुउद्योजक कमालीचे त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे दुरुस्तीच्या नावाखाली दर शुक्रवारी सहा सात तास खंडित करण्यात येणारा वीजपुरवठा दहा तासांवर जात होता. तरीही वारंवार वीज गायब होण्याचे प्रकार वाढीस लागल्याने त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
शहापुरातील रामबाग येथे कमर्शिअल कनेक्शनसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर, अनावश्यक जादा लोड कमी करणे, ब्राह्मण आळी, खालचा नाका, सावंत विहार, मानेनगर तसेच पंडित नाका येथे नव्याने जादा ट्रान्सफॉर्मर बसवणे असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. यावेळी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष गौरी अग्रवाल, किशोर गुजराथी, सोमनाथ काबाडी, किशोर अग्रवाल, यशवंत गुजरे, विशाल मडके, पंकज पोरवाल, योगेश शहा, जयवंत जोशी यांसह महावितरणचे शहापूर शहर अभियंता आदित्य जोशी व पांडुरंग खंबायत उपस्थित होते.