
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने 18 वर्षांत पहिल्यांदाच आयपीएल चषकावर नाव कोरले. मात्र ‘आरसीबी’ संघाच्या विजयोत्सवाला बंगळुरूत गालबोट लागले. चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयाचा जल्लोष क्रिकेट प्रेमींच्या जिवावर बेतला असून लाखोंची गर्दी उसळल्यामुळे स्टेडियमचे गेट तुटले आणि भयंकर चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला. तर 33 वर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काहीची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या ‘आयपीएल’च्या रोमहर्षक अंतिम सामन्यात ‘आरसीबी’ने पंजाब किंग्ज संघाचा पराभव करीत पहिल्यांदाच विजय मिळविला. या संघातील ‘रन मशीन’ विराट कोहली, कर्णधार रजत पाटीदारसह संपूर्ण संघ बुधवारी बंगळूरुत दाखल झाला. विमानतळावरच हजारो क्रिकेट रसिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर ‘आरसीबी’च्या टीमचा कर्नाटक विधान भवनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विधान भवन ते चिन्नास्वामी स्टेडियम विजयी संघाची ओपन व्हिक्टरी परेड निघणार होती. मात्र रस्त्यावर क्रिकेटप्रेमींची प्रचंड गर्दी उसळल्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली. ऐनवेळी ही परेड रद्द केली आणि थेट स्टेडियमवर विजयी संघ पोहचला आणि सत्कार समारंभ झाला. पण त्याचवेळी गेट क्रमांक तीन जवळ भयंकर चेंगराचेंगरी झाली.
गेट तुटले, प्रचंड रेटारेटी, चेंगराचेंगरी
दुपारी बारापासून क्रिकेटप्रेमींनी स्टेडियमवर गर्दी करण्यास सुरुवात केली. स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 35 हजार असताना 2 ते 3 लाख लोकांची गर्दी स्टेडियमच्या परिसरात झाली. गेट क्रमांक तीन जवळ रेटारेटी झाली. त्यातच गेट तुटले आणि चेंगराचेंगरी झाली. अनेकजण चिरडले गेले. प्रचंड गोंधळ उडाला. पोलिसांनाही गर्दीवर नियंत्रण मिळवता आले नाही. या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. तर 33 वर जखमी आहेत.
पोलिसांनी अचानक रस्ते बंद करून लाठीमार केला
पोलिसांनी स्टेडियमकडे जाणारे रस्ते अचानक बंद केले. स्टेडियमचे सर्व गेटही बंद करण्यात आले आणि मुख्य प्रवेशद्वारावर लाठीमार केला, असे प्रत्येक्षदर्शीने सांगितले.
..तरीही कार्यक्रम सुरूच होता
चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर दोन ते तीन लाखांची गर्दी जमा झाली होती. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. यामुळे गर्दीने नियंत्रण गमावले आणि चेंगराचेंगरी झाली. बाहेर चाहत्यांचे जीव गेले असतानाही आत कार्यक्रम सुरूच होता. तब्बल तासभर चाललेला हा सोहळा शोककळेत परिवर्तित होऊनही क्रिकेट संघटनेने पूर्ण केला.
घटनाक्रम…
- मंगळवारी रात्री रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा अवघ्या 6 धावांनी पराभव केला.
- गुजरातमध्ये विजयी जल्लोष केल्यानंतर संपूर्ण टीम बुधवारी सकाळी बंगळुरूत दाखल झाली.
- कर्नाटक क्रिकेट बोर्डाकडून विजेत्या खेळाडूंची भव्य मिरवणूक काढून सन्मान करण्याचे नियोजित होते.
- मात्र थेट मैदानात न जाता आरसीबीच्या खेळाडूंचा बंगळुरू विधानसभेत सत्कार करण्यात आला.
- तुफान गर्दी झाल्याने मिरवणुकीला परवानगी नाकारली.
- सायंकाळी होणाऱया खेळाडूंच्या सत्कार सोहळय़ासाठी आलेल्या क्रिकेटप्रेमींची प्रचंड गर्दी उसळली आणि गेट क्र. 3 जवळ चेंगराचेंगरी झाली.
दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी
मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत दिली जाईल. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. स्टेडियमची क्षमता 35 हजार इतकी आहे. मात्र प्रचंड संख्येने लोक आले. विधान भवन भागातच तीन लाख लोक जमा झाले होते, असे ते म्हणाले.