अवघ्या तासाभराच्या पावसाने कल्याण -डोंबिवलीच्या नालेसफाईची पोलखोल, केडीएमसी मुख्यालय परिसरात गुडघाभर पाणी

अवघ्या तासाभराच्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे नालेसफाई कागदावरच झाल्याने शहराच्या अनेक भागांत पाणी तुंबले होते. गटारे, नाल्यातून पावसाच्या पाण्याचा विसर्ग न झाल्याने पालिका मुख्यालय परिसरात तर गुडघाभर पाणी साचले. नागरिक आणि वाहनांना पाण्यातून वाट काढावी लागत होती. त्यामुळे शहरवासीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

प्रशासनाची नाचक्की
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून दरवर्षी नालेसफाईच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र पावसाळ्यात नाले, गटारी तुंबून राहिल्याने सफाईची पोलखोल होते. यंदा तर पहिल्याच तासाभराच्या पावसात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून काही अंतरावर असलेले रस्तेच पाण्याखाली गेल्याने केडीएमसीची नाचक्की झाली.

आजूबाजूच्या परिसरात सकाळच्या सुमारास तासभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. तासभर कोसळलेल्या या पावसाने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नालेसफाईची मात्र चांगलीच पोलखोल केली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, संत रोहिदास चौक परिसरातील रस्ता पाण्याखाली गेला.

रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचल्याने या पाण्यातून वाहने चालवताना वाहनचालकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. काही वाहनेदेखील या पाण्यामुळे बंद पडली. दरवर्षी याच परिसरात पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचते मात्र केडीएमसीकडून काहीच उपाययोजना होत नसल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला.