
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मतदानाची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. अचानक वाढलेले मतदान हे अनौरस, बोगस असल्याने काँग्रेस पक्षाने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली पण चौकशी काही केली जात नाही. राहुल गांधी यांनी संसदेत व संसदेबाहेरही हा प्रश्न लावून धरला आहे. आज देशभरातील प्रमुख वर्तमानपत्रात त्यांचा या विषयावर लेख प्रकाशित झाल्याने राजकीय भूकंप झाला असून निवडणूक फिक्सिंगच्या चौकशीची मागणी होत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी मतदानाच्या घोटाळ्याचा प्रश्न आकडेवारीसह मांडला आहे, हा आरोप नाही तर तथ्य व आकडेवारीसह त्याची मांडणी करून चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील दीड तासाच्या भाषणात यावर चकार शब्दही काढला नाही. हा लोकशाही व्यवस्थेवर निर्माण झालेला गंभीर व चिंताजनक मुद्दा आहे. काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडेही हा मुद्दा सविस्तरपणे मांडला पण त्यांनी खुलासा करून वस्तुस्थिती मांडण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर नियमातच बदल करून व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि CCTV फुटेज व माहिती देता येणार नाही असा नवा फतवा काढला आहे, हा लोकशाहीवरचा घाला आहे. काही गौडबंगाल नाही तर माहिती का लपवली जात आहे?, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आकडेवारी देत पुढे म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर 2024 च्या निवडणुकीपर्यंत 5 वर्षात महाराष्ट्रात 31 लाख मतदार संख्या वाढली पण 2024 लोकसभा निवडणूक ते 2024 विधानसभा निवडणूक या अवघ्या 5 महिन्यात 41 लाख मतदार वाढले यातच मोठे गौडबंगाल आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरही संशय बळावला आहे. 2004 च्या निवडणुकीत प्राथमिक मतदानाची आकडेवारी 60 टक्के होती ती अंतिम 59.5 टक्के झाली. 2014 साली प्राथमिक मतदान 62 टक्के तर अंतिम 63 टक्के झाल्याचे जाहीर केले. 2019 साली प्राथमिक टक्केवारी 60.46 टक्के होती तर अंतिम टक्केवारी 61.10 टक्के होती परंतु 2024 च्या निवडणुकीत मात्र मतदानाची प्राथमिक टक्केवारी 58.22 टक्के असताना अंतिम टक्केवारी मात्र 66.5 टक्के जाहीर करण्यात आली, ही तब्बल 8 टक्क्यांची वाढ हाच कळीचा मुद्दा आहे. आधीच्या चार-पाच निवडणुकीतील मतदानात १ टक्क्यांचीही तफावत नसताना 2024 च्या निवडणुकीत 8 टक्के तफावत कशी? वास्तविक पाहता आधुनिक तंत्रज्ञानाने सर्व यंत्रणा अद्यावत झालेल्या असताना अशा पद्धतीने घोळ कसा काय झाला, याचे उत्तर निवडणूक आयोग देत नाही.
मतांच्या चोरीचा मुद्दा एवढ्यावरच थांबत नाही तर जे प्रश्न निवडणुक आयोगाला विचारले त्यांनी उत्तर देणे अपेक्षित असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे उत्तर देत आहेत ते का? आता हाच मतदान चोरीचा पॅटर्न आगामी बिहार विधानसभा निवडणूक, मुंबई महानगरपालिका निवडणूक व राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही वापरण्याचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली आहे, लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे हे लक्षात घेऊन प्रदेश काँग्रेस १२ जूनला राज्यभर मशाल मोर्चे काढून जनजागृती करणार आहे. गडचिरोली येथील मोर्चात आपण सहभागी होत आहोत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.