दरवाढीने बेस्टचे उत्पन्न वाढले; प्रवासी मात्र पाच लाखांनी घटले, तिजोरीत महिनाभरात 74 कोटी रुपयांची वाढ

आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाने तिकीट दरात दुपटीने वाढ करून आर्थिक डोलारा सावरण्याचा प्रयत्न केला. या दरवाढीमुळे बेस्टच्या मासिक उत्पन्नात सरासरी 74 कोटींनी वाढ होत आहे. मात्र, महिनाभरात बेस्टचे 5 लाख प्रवासी कमी झाले आहेत. त्यामुळे आधीच प्रवासी संख्या घटणाऱ्या बेस्टसाठी ही आणखी चिंता वाढवणारी बाब आहे.

गेल्या 10 वर्षांत बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात सापडला आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेने दर वर्षी अनुदान देत बेस्टचा आर्थिक डोलारा सावरण्याचा प्रयत्न केला. मुंबई महापालिकेने बेस्ट उपक्रमाला 2016 ते आतापर्यंत 11 हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. तरीही बेस्टची आर्थिक स्थिती न सुधारल्यामुळे मुंबई महापालिकेने मंजुरी दिल्यानंतर 9 मेपासून तिकीट दरात वाढ केली. साध्या बससाठी पहिल्या पाच किमीसाठी 5 रुपयांऐवजी 10 रुपये तर वातानुकूलित बससाठी पहिल्या पाच किमीसाठी 6 रुपयांऐवजी 12 रुपये अशी तिकीट दरवाढ केली आहे. मात्र, तिकीट दरवाढ झाल्याने बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्नात वाढ झाली असली तरी प्रवाशांच्या संख्येत मात्र सातत्याने घट होत आहे.

128 बस भंगारात  

तिकीट दरवाढ झाली त्या दिवशी बसच्या ताफ्यात 2 हजार 721 बसगाडय़ा होत्या. त्यात बेस्ट उपक्रमाच्या अवघ्या 602 बसगाडय़ा होत्या व उर्वरित भाडेतत्त्वावरील बस होत्या. आज बेस्टकडे 2 हजार 593 बसगाडय़ा असून बेस्टकडे अवघ्या 436 बसगाडय़ा आहेत. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यातून महिनाभरात 128 बस भंगारात निघाल्या आहेत.

पालिकेने कोटय़वधीची मदत करूनही बेस्ट खड्डय़ातच!

‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकांकडून बेस्टचा गाडा हाकण्यासाठी वारंवार पालिकेकडून आर्थिक मदत घ्यावी लागत आहे. बेस्टच्या परिवहन विभागास अंदाजे दरमहा 150 कोटी ते 180 कोटी रुपये इतकी आर्थिक तूट असल्याचे नमूद केले आहे. सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन सन 2019-20 पासून ते सन 2023-24 मधील 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेल्या तरतुदींमधून 3425.32 कोटी रुपये व तरतुदींव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान रक्कम म्हणून 4643.86 कोटी रुपये असे एकूण 8069.18 कोटी एवढय़ा रकमेचे अधिदान महापालिकेने ‘बेस्ट’ला केले आहे. तरीदेखील बेस्ट तोटय़ातच आहे.