
राज्यात वेळेआधी दाखल झालेल्या मान्सूनने आता संपूर्ण राज्यात स्थिरावण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच अनेक जिह्यांमध्ये पावसाने अक्षरशः धुमशान घातले आहे. मात्र हवामान खात्याने मुंबईसाठी अतिवृष्टीचा इशारा देऊनही पाऊस पडला नाही, तर 12 जूनपासून पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचेही हवामान खात्याने जाहीर केले आहे.
राज्यात आज सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात किनारी भागात जोरदार पाऊस बरसला, तर मुंबईत सकाळी उपनगरात पावसाच्या काही सरी बरसल्या. हवामान खात्याने तर मुंबईत दुपारनंतर तीन तास जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिला होता, मात्र पाऊस पडलाच नाही.
- 12 ते 13 जूनपर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे, तर येत्या पाच ते सहा दिवसांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यामध्ये ताशी 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशाराही दिला आहे.
राज्यात मान्सूनला पोषक वातावरण असल्यामुळे उद्या 8 जून रोजी विविध भागांत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे, सातारा, सांगली आदी भागांत वादळी पाऊस होईल. – कृष्णानंद होशाळीकर, हवामानतज्ञ